बळीराजा शेतकरी संघटनेकडून आयुक्तांना निवेदन
कराड – शेवाळेवाडी ता. कराड येथील रयत-अथणी साखर कारखान्याने सन 2018-19 मधील गळीत उसाची एफआरपी न दिल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यावर तात्काळ जप्तीची कारवाई करण्याचे आदेश बुधवारी दिले. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कारखाना देत नसल्याने कारवाई करावी अन्यथा 27 ऑगस्ट रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला होता. याबाबतचे निवेदनही साखर आयुक्तांना देण्यात आले होते. साखर आयुक्तांनी त्यावर लगेच निर्णय देत जप्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शासन नियमानुसार ऊस गाळप झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे रक्कम देणे बंधनकारक आहे. रक्कम न दिल्यास विलंब कालावधीकरीता पंधरा टक्के याप्रमाणे व्याज आकारणीची तरतूद आहे. याबाबतच्या सूचना कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. तरीही दि. 15 ऑगस्ट अखेर अथणी शुगर्सकडे एफआरपीपोटी 567.60 लाख रुपये व्याजासहीत थकीत दिसत आहेत. कारखान्याने एकप्रकारे शासनाच्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे 1966 मधील कलम 3 (8) नुसार ऊसदराची थकीत रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून आरआरसीचे आदेश पारित केले जातात.
या आदेशानुसार कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनांची विक्री करून त्यामधून सदर रक्कम वसूल करण्यात यावी. आवश्यकतेनुसार कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. सदर मालमत्तेची जप्ती करत त्याची विहित पद्धतीने विक्री करून शेतकऱ्यांना ही रक्कम अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ऊस उत्पादकांना पंधरा टक्के व्याजासह रक्कम मिळाल्याची खात्री करण्याबाबतच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.