लाहोर -पाकिस्तानच्या आजी-माजी क्रिकेटपटूंना सध्या चांगलेच तोंड फुटले आहे. आता त्यात रशिद लतिफ या माजी कसोटीपटूची भर पडली आहे. वीरेंद्र सेहवाग हा सचिन तेंडुलकर व राहुल द्रविडमुळे कायमच दुर्लक्षीत राहिला अशी मुक्ताफळे लतिफने उधळली आहेत.
भारतीय संघात पदार्पण केल्यापासून सेहवाग कायम सचिन व द्रविडच्या सावलीत राहिला. त्याच्या नावावर कसोटीत 8 हजारांपेक्षा जास्त धावा दिसत असल्या तरी त्याला 10 हजार धावांचा पल्ला पार करणे सहज शक्य होते. मात्र, त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये केवळ सचिन व द्रविड यांनाच महत्त्व दिले जात होते. सेहवाग जर अन्य कोणत्या संघात असता तर त्याने हा धावांचा पल्ला कधीच पार केला असता, असेही लतिफ बरळला आहे.
जेव्हा जागतिक क्रिकेटमध्ये ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, वसिम अक्रम, शोएब अख्तर असे अत्यंत भेदक व प्रचंड वेगवान गोलंदाज होते, त्यावेळी सर्व नावाजलेले फलंदाजही खेळपट्टीचा, चेंडूच्या उसळीचा तसेच स्विंगचा अंदाज घ्यायचे व त्यानुसार फलंदाजी करायचे. मात्र, सेहवाग असा एकमेव फलंदाज होता की जो यांपैकी एकाही गोलंदाजाला षटकार व चौकार मारताना अजिबात घाबरलेला दिसला नाही. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो या गोलंदाजांवर हल्ला करताना दिसायचा. त्याच्या इतका निडर फलंदाज मी पाहिला नाही. पण मोठ्यांच्या सावलीतच त्याला रहावे लागले. त्याची स्वतःची अशी शैली होती व एक वेळ अशी आली होती की सचिनपेक्षाही त्याची आक्रमक फलंदाजी जास्त पाहिली जायची, असेही लतिफने सांगितले.
सचिन तेंडुलकरकडून प्रेरणा घेत शेकडो क्रिकेटपटू आक्रमकतेची कास धरताना दिसले. मात्र, सेहवागचाही आदर्श अनेकांनी घेतला पण त्याची इतकी चर्चाच झाली नाही. क्रिकेट खेळत असलेल्या सर्व देशांच्या सर्वात महत्वाच्या गोलंदाजावर सचिनने जितके वर्चस्व राखले नाही ते काम सेहवागने अगदी सहज केले. मात्र, त्यावेळी सचिन, द्रविड तसेच तत्कालिन कर्णधार सौरव गांगुली यांच्याच नावाचा गजर होत होता. सेहवागकडे कायमच दुर्लक्ष झाले, असेही पालुपद लतिफने जोडले आहे.
करोनामुळे सध्या जागतिक क्रिकेट ठप्प असल्याने अनेक खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्यातच पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय क्रिकेटवर, खेळाडूंवर किंवा एकूणच भारतातील क्रिकेट व्यवस्थेबाबत सातत्याने टीकेचा सूर लावल्याचे समोर येत आहे. अख्तरने सुरु केलेल्या या शाब्दीक युद्धात जावेद मियांदाद, रमीज राजा, शाहिद आफ्रिदी आणि आता रशिद लतिफ यांनीही उडी घेतली आहे. दररोज नवनवीन विधाने करत स्वतःला ट्रोल करुन घेण्यातच ते धन्यता मानताना दिसत आहेत.