मुंबई, दि.18- प्रदिर्घ लॉक डाऊनमधून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने बराच गाजावाजा करून आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार हे पॅकेज राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल दहा टक्के म्हणजे 21 लाख कोटी रुपयाचे आहे. मात्र गुंतवणूकदारांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्री करून पॅकेजवर नापसंती दर्शविली आहे.
सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 3.44 टक्के म्हणजे 1,068 अंकांनी कोसळून 30,028 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 313 अंकानी म्हणजे 3.43 टक्क्यांनी कोसळून 8,823 अंकांवर बंद झाला.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपन्यांनी कर्जाची परतफेड केली तरी एक वर्षे त्यांच्याविरोधात दिवाळखोरी संहितेनुसार कार्यवाही सुरू केली जाणार नाही. त्याचबरोबर यासाठीची रक्कम मर्यादा एक लाख रुपयांवरून एक कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे या उद्योगांना कर्ज दिलेल्या बॅंकांच्या शेअरवर सोमवारी जास्त परिणाम झाला. इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, इत्यादी बॅंकांचे शेअर कोसळले. त्याचबरोबर मारुती-सुझुकी, अल्ट्राटेक या कंपन्यांच्या शेअरच्या परिणाम झाला. या अवस्थेतही टीसीएस, इन्फोसिस, आयटीसी, एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर वधारले
या घटनाक्रमाचे विश्लेषण करताना आनंद राठी या संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, काल सायंकाळी गृहमंत्रालयाने लॉक डाऊनची कालमर्यादा 31 मे पर्यंत वाढविली आहे. यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्याचबरोबर मागणी वाढविण्यासाठी पॅकेजमध्ये फारसा तरतुदी नसल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
पॅकेजमध्ये छोट्या उद्योगांना कर्ज पुरवठयावर भर दिलेला आहे. मात्र मागणी वाढण्यासाठी नागरिकांच्या खिशात पैसे जाणार नाहीत. आज जागतिक बाजारातील वातावरण सकारात्मक असूनही भारतीय शेअर बाजार निर्देशांक मात्र कमी झाले. जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यामुळे क्रुडचे भावही आज साडेचार टक्क्यांनी वाढून ते 33 डॉलर प्रति पिंपावर गेले. सध्या भारतीय शेअर बाजारासह सर्व जागतिक शेअर बाजारावर करोना व्हायरसचा परिणाम झाला आहे. यामुळे जगात 3 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 47 लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. भारतात मृत्यूची संख्या 3 हजारावर तर संसर्गाची संख्या 1 लाखाच्या जवळ गेली आहेत.