नवी दिल्ली, दि.12- मेच्या पहिल्या आठवड्यापासून केंद्र सरकारने काही क्षेत्रात ई कॉमर्सद्वारे जीवनावश्यक वस्तूबरोबरच इतर वस्तूचा पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ई-कॉमर्सची उलाढाल आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.
गेल्या वर्षाच्या मे महिन्यामध्ये पहिल्या पंधरवाड्यात ज्या प्रमाणात उलाढाल झाली होती तेवढी उलाढाल झाली नसली तरी परिस्थिती बरीच सकारात्मक झाली आहे. ग्राहक आता कपडे, स्मार्टफोन आणि इतर साहित्य ई-कॉमर्स च्या माध्यमातून मागवू लागले आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली आहे. सुरुवातीच्या काळात ई- कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि आरोग्यविषयक उत्पादने मागविण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र आता बऱ्याच क्षेत्रात इतर वस्तू पुरविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रेड झोन मधील ज्या भागात संसर्ग नाही अशा भागातही ई-कॉमर्स कंपन्या सेवा देऊ लागल्या आहेत. त्याचा दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद इत्यादी शहरातील नागरिकांना उपयोग होऊ लागला आहे.
ज्या वस्तू खरेदी केल्या जात आहेत, त्यामध्ये मोबाईलचे चार्जर, पुस्तके, खेळाचे साहित्य, दाढी करण्याचे सामान इत्यादीचा समावेश आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत आमची उलाढाल वेगाने पूर्वपदावर येऊ लागली असल्याचे एका कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. त्याचबरोबर आम्ही आगामी काळाबद्दल जास्त आशावादी आहोत.
कारण लॉक डाऊनचा कालावधी संपल्यानंतरही बरेच ग्राहक थेट दुकानात जाऊन वस्तू घेण्याऐवजी ई- कॉमर्सचा वापर करून वस्तू घेण्याची शक्यता वाढली आहे. कारण यामुळे इतरांचा स्पर्श टाळता येतो. त्यामुळे सध्याच्या काळात बरेच नवे ग्राहक आम्हाला मिळू लागले आहेत. आगामी काळातही नव्या ग्राहकांची संख्या वाढणार असल्याचे पेटीएम मॉलचे उपाध्यक्ष श्रीनिवास मोठी यांनी सांगितले.