नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर शीतयुद्धाची परिस्थिती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने तणाव कमी करण्याची स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला गेलं पाहिजे, असे विधान चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिसरी यांनी केले आहे. याचा अर्थ चीनने भारतभूमीत अतिक्रमण केले आहे, याची एकप्रकारे कबुलीच मिसरी यांनी दिली आहे. भारत-चीन सीमावाद मिटवण्यासाठी चीनने LAC जवळील नवीन बांधकाम थांबवावे, असेही मिसरी यांनी म्हटले आहे. यानंतर चीन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना चीन-भारत सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सीमावाद मिटवायचा असेल तर एलएसी जवळील बांधकाम चीनने थांबवावे, असा सल्ला राजदूत मिसरी यांनी दिला आहे. सोबतचं चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला गेले पाहिजे, असेही म्हटले आहे. हे विधान अशासाठी महत्वाचे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते .
दरम्यान, भारत-चीन सीमेवरील ताण अजूनही कमी होताना दिसत नाही. चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव हा कराराचा भंग असल्याचा आरोप भारताने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. मागच्याच आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, असे वाटत असतानाच चीनने पुन्हा सीमेपलीकडे सैन्याची आणि युद्धसाहित्याची आवक वाढवली आहे.