प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) ही राज्याची प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या विभागाच्या सदाशिव पेठेतील कार्यालय व आवाराच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहे. विद्या प्राधिकरणाला प्रशिक्षणातून मिळणाऱ्या शुल्कातूनच या सुरक्षारक्षकांच्या वेतनाचा खर्च भागविण्यात येणार आहे.
शिक्षकांना प्रशिक्षण देणे, पहिलीपासून बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करणे ही महत्वाची कामे विद्या प्राधिकरणातर्फे राबविण्यात येतात. या विभागाचे कार्यालय हे ब्रिटिशकालीन असून, याचे सुशोभीकरण करण्यासाठी 14 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. यामुळे कार्यालयाचा लूक बदलला. या कार्यालयामार्फत केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या कार्यालयामार्फत शिक्षक, अधिकारी यांच्यासाठी काहींना प्रशिक्षण सुरु असते. प्रशिक्षणार्थींना वसतिगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध असते. मुख्य कार्यालयाची इमारत, ग्रंथालय, वसतिगृह, अतिथी भवन यांसह अन्य काही विभागांची कार्यालये आहेत. कार्यालयाचा आवार खूप मोठा आहे.
त्यामुळे कार्यालयाला सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता भासू लागली. सुरक्षारक्षक नियुक्तीसाठी अनुदान व मान्यता मिळविण्याबाबतचा प्रस्ताव फेब्रुवारी 2022 मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये शासनाला पुन्हा स्मरणपत्र पाठविण्यात आले होते. मात्र शासनाकडून त्यावर काहीच अंतिम निर्णय झाला नाही. अखेर विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या फीमधून सुरक्षारक्षकांच्या वेतनाचा खर्च भागविण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा पाठविला आहे. यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
15 सप्टेंबरपासून कार्यवाही
जिल्हा सुरक्षा मंडळाकडून सहा सुरक्षारक्षक घेण्यात येणार आहे. 15 सप्टेंबरपासून हे सुरक्षारक्षक कार्यरत होतील. दरमहा या सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी दीड लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. दिवस-रात्र हे सुरक्षारक्षक कार्यरत राहणार आहेत. बंदुकधारी सुरक्षा रक्षकांचाही नंतर समावेश करण्यात येणार आहे.