सातारा – बामणोली, तापोळा भागात पर्यटनवाढीसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या बामणोली- दरे आणि आपटी- तापोळा यादरम्यान सी लिंक पद्धतीचे दोन भव्य केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहेत. स्थानिकांना दळणवळणासाठी हे पूल उपयोगी पडणार असून महामार्गावरून तसेच मुंबई पुण्यावरून येणारे पर्यटक पाचवडमार्गे थेट या भागात येऊ शकतील आणि पुढे कोकणातही जाऊ शकतील. या पुलांच्या उभारणीमुळे बामणोली भागातील पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून आणि पाठपुराव्यातून हे दोन पूल मंजूर झाले आहेत. 300 कोटी निधीचा बामणोली ते दरे असा जोडणारा 720 मीटरचा केबल स्टे ब्रिज होणार असून बामणोली बाजूला 150 मीटर तर, दरे बाजूला 450 मीटर पोहोच मार्ग होणार आहेत. याचा लाभ आसपासच्या सर्वच गावांना होणार आहे. याच मार्गाला महामार्गावरून पाचवड हॅम रस्ता दरे येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे महामार्ग आणि पुणे, मुंबईवरून येणाऱ्या पर्यटकांना कराडवरून कोकणात जाण्याऐवजी बामणोली- दरे पुलामार्गे थेट कोकणात उतरता येणार आहे. यामुळे साहजिकच बामणोली भागातील पर्यटन वाढणार आहे. याशिवाय पर्यटकांचा वेळ आणि इंधन बचत होणार आहे. 150 कोटी निधीतून आपटी ते तापोळा असा 560 मीटरचा केबल स्टे ब्रिज उभा राहणार आहे.
आपटी बाजूस 200 मीटर तर, तापोळा बाजूस 300 मीटर पोहोच रस्ते प्रस्तावित आहेत. हा पूल झाल्यानंतर आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून 25 किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार आहे. या दोन्ही पुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासंदर्भाने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी आढावा बैठक घेतली. यावेळी जावळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एस. पवार, शाखा अभियंता निलेश कोहाळे, महेश कुन्हाळीकर, सेवा सल्लागार कंपनी टीपीएफ कन्सल्टन्सीचे अधिकारी, जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बामणोली भागातील सर्वच गावांतील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शासकीय सोपस्कार पूर्ण करून दोन्ही पुलांचे काम तातडीने सुरु करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या.
या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळे या भागातील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या भागातील रोजगार आणि व्यापार वृद्धी होईल. पर्यटकांनाही बामणोलीतून थेट कोकणात उतरता येणार आहे. महाबळेश्वर ते बामणोली असाही प्रवास कमी वेळेत करता येणार असल्याने या दोन्ही पुलांचा फायदा स्थानिकांसह पर्यटकांना होईल.
शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, सातारा- जावळी