डॉ. मेघश्री दळवी
युद्धाचे पडसाद दीर्घ काळापर्यंत उमटतात, असं म्हणतात. केवळ शरीर-मनावर नाही तर पर्यावरणावरही एखाद्या युद्धाचे खूप खोल परिणाम होतात. औद्योगिक क्षेत्रावर मारा केला तर तिथल्या तऱ्हेतऱ्हेच्या रसायनांची गळती होण्याचा प्रचंड धोका असतो. कित्येक धोकादायक पदार्थ थेट वातावरणात मिसळून जाण्याची शक्यता असते. युक्रेनच्या अणुकेंद्राची पडझड झाली असती तर आपल्या सर्वांवर केवढं भयंकर संकट ओढवलं असतं, कल्पनाही करणं नको वाटतं.
युद्धात गुंतलेले देश आपल्या परीने अशी टोकाची हानी टाळत असले तरी एकूणच वापरली जाणारी स्फोटकं, दारूगोळा, जमिनीतले सुरूंग, यांनी प्रदूषणात लक्षणीय भर पडते. हवेच्या प्रदूषणासोबत जमिनीत झिरपणारी रसायनं आणि तेल यांच्यामुळे जमिनीचा कस वेगाने घसरतो. भूजलात हे घटक मिसळले तर शेतीसाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध पाण्याचा दर्जा खालावतो.
शेती आणि संबंधित व्यवसायांना युद्धाची झळ लागल्यावर या क्षेत्राची पीछेहाट होत जाते. आरमारी जहाजांचं किंवा पाणबुड्यांचं नुकसान एक वेळ भरून काढता येईल, पण त्या दरम्यान समुद्रात होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाने मात्र कधीही भरून येणार नाही इतकी हानी होते. या साऱ्याचे चटके त्या प्रदेशातल्या सर्वच सजीवांना, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला आणि तिथल्या अन्नसाखळीला बसतात.
पहिल्या महायुद्धाच्या काळात पर्यावरण आणि परिसंस्था (इकोसिस्टम) यांच्या अभ्यासाची व्याप्ती इतकी मोठी नव्हती. पण नंतर केलेल्या अभ्यासानुसार काही देशांनी महायुद्धात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणखी झपाट्याने औद्योगिकरणाची वाट धरली. शेतीत यंत्रांचा वापर वाढला, खनिजतेलाचा उपसा वाढला आणि खाणींच्या संख्येतही भर पडली, अशी निरीक्षणंही अनेक अभ्यासकांनी केलेली आहेत. त्याचा परिणाम प्रदूषणवाढीत दिसून आला.
दुसऱ्या महायुद्धाच्या बाबतीत तुलनेने जास्त संशोधन उपलब्ध आहे. त्यातल्या एकानुसार बॉम्बच्या माऱ्यामुळे शहरं उद्ध्वस्त होतात तेव्हाचं प्रदूषण आणि नंतर पूर्ण पायाभूत सुविधा पुन्हा उभारतानाच प्रदूषण असा दुहेरी भार पर्यावरणाला सहन करावा लागतो. मागच्या शतकात गल्फ युद्धामुळे पर्यावरणावर झालेल्या परिणामांचं गंभीरपणे मूल्यमापन झालं आहे आणि त्यातून उभं रहाणारं चित्र खरोखरीच निराशाजनक आहे.
युद्धाच्या काळात रिसायक्लिंगसारख्या अनेक गोष्टी मागे पडतात. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने काही प्रकल्प सुरू असतील तर त्यांचं प्राधान्य कमी होतं. अनेकदा कसंही करून जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले जातात, त्यात पर्यावरणस्नेही प्रक्रियांकडे दुर्लक्ष होतं. एकूणच आज-आता जिवंत राहण्याला महत्त्व आल्याने शाश्वत तंत्रज्ञानाचा आग्रह धरणं कठीण होत जातं.
युद्धामुळे सक्तीचं स्थलांतर होतं, लाखो-कोट्यवधी लोकांना मिळेल तिथे आसरा घ्यावा लागतो आणि आपली जीवनशैली बदलणं भाग पडतं. त्यात नैसर्गिक संसाधनांचा अनियंत्रित वापर होतो आणि त्याच्या अनुषंगाने परिसंस्थांमध्ये हानिकारक बदल होतात याकडेही अनेक संशोधकांनी लक्ष वेधलं आहे. त्यामुळे कोणतंही युद्ध हे अनेक अर्थांनी पर्यावरणाविरुद्धचं युद्ध ठरतं.