“पानी पिजीए छान कर, और गुरु किजीए जान कर।’ असे म्हणतात. आपल्या आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींमध्ये खरेच आपले गुरू, आदर्श होण्याची पात्रता आहे का? याविषयी थोडेसे…
आपण सर्वच जण वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असतो. अशा सर्वच क्षेत्रांत आपल्यापेक्षा जास्त कुशल, कार्यक्षम, बुद्धिमान वगैरे वगैरे बऱ्याच गुणांनी सरस अशा बऱ्याच व्यक्ती असतात. अशा प्रत्येक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींबाबत आपल्याला आदर निर्माण होतच असतो. आपण पहिल्या पायरीवर उभे असू तर अशा दिग्गज व्यक्ती सगळ्यात वरच्या पायरीवर असतात. तेथे पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीने घेतलेली मेहनत खूपच जास्त असते. आपणही त्या पायरीवर पोहोचण्याचे स्वप्न बघतो. आपणही मेहनत घेतच असतो. कालांतराने आपल्याला कळते, त्या उंचीवर पोहोचणे किती मुश्किल आहे. यामुळेच अशा व्यक्ती आपल्या आदर्श बनतात.
लहानांनी थोरा-मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत असे काहीसे आपल्या मनावर लहान असल्यापासूनच बिंबविले जाते. लहान असताना मीही बऱ्याच व्यक्तींपुढे अगदी नतमस्तक झालो. त्यांचे आशीर्वाद घेतले. जसजसे वय वाढत गेले तसतसे मला जाणवू लागले ते म्हणजे, ज्या व्यक्तींच्या पाया आपण पडत आलो त्यांनी काय त्यांच्या आयुष्यात कंदील लावले म्हणून त्यांच्या पाया मी पडावे? अशा व्यक्तींबाबत अधिक माहिती काढता समजले की, अरे या व्यक्तींचे काहीच कर्तृत्व नाही. या व्यक्ती तर परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी पळच काढत आहेत. या व्यक्तींना कुठल्या निकषांवर “आदर्श व्यक्ती’ म्हणू शकतो? मग अशा व्यक्तीला मी केवळ माझ्या आधी जन्माला आला म्हणून मी नमस्कार का म्हणून करू? अशा व्यक्तीकडून मजला काय आशीर्वाद मिळणार? त्यांची आशीर्वाद देण्याची पात्रता आहे काय?
महाभारतामधील गोष्ट सांगावीशी वाटते- जयद्रथाचे वडील वृद्धक्षत्र हे जयद्रथाचे हाती सर्व राज्यकारभार सोपवून वानप्रस्थाश्रमाला निघून जातात. अरण्यात तपश्चर्या करत असतात. जयद्रथ वडिलांना भेटून सांगतो, “मजला आपल्या तपश्चर्येचे सामर्थ्य वापरून इच्छा मरणाचा वर द्यावा. जसा महाराज शंतनू यांनी त्यांचा मुलगा देवव्रत (भीष्म) याला दिला होता.’ वृद्धक्षत्र म्हणतात, “तो वर देण्यासाठी मी काही शंतनू नाही आणि स्वीकारण्यासाठी तू काही देवव्रत नाही. तो वर असा आहे की केवळ महाराज शंतनूच देऊ शकतात आणि केवळ देवव्रतच स्वीकारू शकतो.’ पण त्यांनी जयद्रथास एक वर दिला तो म्हणजे “ज्याच्या हातून जयद्रथाचे मस्तक जमिनीवर पडेल त्याच्या मस्तकाचे अनेक तुकडे होतील’ युद्धात अर्जुन जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा पूर्ण करताना श्रीकृष्ण सांगतात की, “असा बाण मार की या जयद्रथाचे मस्तक नदी पलीकडे बसलेल्या वृद्धक्षत्राच्या मांडीवर जाऊन पडेल.’ त्यानुसार सव्यसाची पाशुपत अस्त्राचा प्रयोग करतो आणि जयद्रथाचे मस्तक वृद्धक्षत्राच्या मांडीवर पडते. अचानक असे आपल्याच मुलाचे मस्तक माडीवर पडलेले पाहून वृद्धक्षत्र ताडकन् उठतात त्याबरोबर ते मस्तक जमिनीवर पडते की लगेच वृद्धक्षत्राच्या मस्तकाचे तुकडे होतात.
आशीर्वाद देण्यासाठी आणि घेण्यासाठी दोघांचीही पात्रता असावी लागते. लहान मुले मजला नमस्कार करतात तेव्हा मी विनम्रपणे सांगत असतो, “माझ्या पाया पडू नका.’ कारण, मी स्वतः कोणता आशीर्वाद देण्यासाठी पात्र आहे? मी असे काय मोठे काम केले आहे, म्हणून कोणी मजला नमस्कार करावा? मी फक्त एवढाच विचार करतो की, “माझी पात्रता काय?’ माझ्यासारखे अनेक द्विपाद प्राणी या पृथ्वीवर आहेत. मी मजला नमस्कार करणाऱ्या लहान मुलांची पात्रता काय याचा विचारच करीत नाही. असेही होऊ शकते हीच लहान मुले मोठी होऊन माझ्या वयाची होतील तेव्हा माझ्यापेक्षा कैक पटींनी त्यांच्या क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवतील. आज ती लहान आहेत मी त्यांच्या आधी जन्माला आलो आहे एवढ्याच निकषावर त्यांनी माझ्या पाया पडावे हे मजला पटतच नाही.
सध्या ज्याचे पाय धरावेत, असे पायच सापडत नाहीत. बरेच आध्यात्मिक गुरू आज गजाआड गेले आहेत, अनेक उद्योजक तुरुंगात आहेत. बऱ्याच मोठ्या व्यक्ती तुरुंगात जरी गेलेल्या नसल्या तरी कृष्ण कृत्ये चालूच आहेत. अशा व्यक्ती आदर्श अजिबातच होऊ शकत नाही.
आपण ज्याला गुरू मानणार आहोत, आदर्श समजणार आहोत, ती व्यक्ती खरेच त्या पात्रतेची आहे का? आपणही त्या व्यक्तीला पारखून घ्यावे आणि मगच आपला आदर्श मानावे. केवळ आपल्या सभोवतालचे लोक अमुक एक व्यक्तीला गुरू मानतात म्हणून आपणही त्या व्यक्तीला गुरू मानून मोकळे व्हावे असे अजिबात करू नये. भविष्यात भयानक वास्तव समोर आले तर आपला फारच मनस्ताप होईल. आपल्याला मनःस्वास्थ्य मिळवायचे आहे मनस्ताप नाही.
बऱ्याच व्यक्ती त्यांच्या कष्टाने, मेहनतीने यशस्वी झालेली असतात. यश मिळविताना त्यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नसते. त्यांचे यश हे निर्भेळ असते. सचिन तेंडुलकर यांनी एका मद्याची जाहिरात करण्यास नकार दिला होता. तो जाहिरातीचा प्रस्ताव डिसेंबर 2010 मध्ये वार्षिक वीस कोटींचा होता. तर विराट कोहली यांनी एप्रिल 2017 साली एका शीतपेयाच्या जाहिरातीचा करार वाढविण्यास नकार दिला. कारण, “जे मी पित नाही ते मी इतरांना प्यायला सांगणार नाही.’ असे स्पष्टपणे सांगितले. तसेच गोरे होण्याच्या मलमाचीही जाहिरात करण्यास नकार दिला. “जे उत्पादन मी वापरतो आणि ज्याच्यावर माझा विश्वास आहे अशाच उत्पादनाची मी येथून पुढे जाहिरात करीन…’ असे स्पष्टपणे विराट कोहली याने सांगितले. 2017 साली विराट कोहली एका दिवसाला 4.5 ते 5 कोटी रुपये एवढे मानधन जाहिरासाठी घेत होता.
ज्या व्यक्ती पैशांपेक्षा “तत्त्व’ यालाच जास्त प्राधान्य देतात ती खरोखरीच आदर्श असतात. आपणही आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसावे आणि विचार करावा- “आपण घेत असलेली मेहनत, करत असलेले काम हे योग्य दिशेने आहे ना?’ याची खात्री करावी, मग आपण कोणाचे आदर्श होत आहोत याकडे लक्ष देऊ नये तसेच जे कोणी खरेच “आदर्श व्यक्तिमत्त्व’ आहेत ते लहान असले तरी त्यांचे अनुकरण करायला लाजायचे नाही. अशा विचारांचे पुष्प आपल्या मनोदेवतेला अर्पण केल्यास आपण स्वतःच्या नजरेत आपली उंची जास्त वाढवू शकू यात शंका नाही. मग कोण काय म्हणेल असा इतरांचा विचार करण्याची गरजच नाही. यशाचे शिखर गाठल्यावर मिळणारे जो आनंद आहे, जे मनःस्वास्थ्य आहे ते कल्पनातीत आहे.
– अनिकेत भालेराव