दहावी, बारावी गुणवंतांना फेब्रुवारीत मिळणार शिष्यवृत्ती
पुणे – शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची जबाबदारी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांवर तसेच काही विभागांवर 31 जानेवारी 2020 पर्यंत देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या सर्वेक्षणासाठी समाज विकास विभागातील उपायुक्तांसह इतर प्रमुख कर्मचाऱ्यांनाही नेमले आहे. त्याचा फटका महापालिकेच्या वतीने शहरातील दहावी आणि बारावीमधील गुणवंतांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीला बसला आहे. या विभागातील कर्मचारी स्वच्छ सर्वेक्षणात असल्याने शिष्यवृत्तीचे अर्जांची अंतिम बिले अद्यापही तयार झालेली नाहीत. त्यामुळे जानेवारी महिना संपल्यानंतरच ही शिष्यवृत्ती मुलांच्या खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत.
समाज विकास विभागाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य आणि भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी 2019 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका असल्याने या शिष्यवृत्तीचे अर्ज नोव्हेंबर 2020 पर्यंत घेण्यात आले. या कालावधीत दहावीसाठी 7,683 तर, बारावीसाठी 3,136 अर्ज असे एकूण 10 हजार 819 अर्ज आले.
या अर्जांची छाननी तसेच तपासणी करण्याचे काम महापालिका प्रशासनाने 15 नोव्हेंबरपासून सुरू केले असून सुमारे साडे सहा ते सात हजार अर्जांची बिले तयार झाली आहेत. तर उर्वरित काम गेल्या काही दिवसांपासून थांबले आहे. या विभागाकडे आयुक्तांच्या आदेशानुसार, स्वच्छ सर्वेक्षणचे काम देण्यात आल्याने शिष्यवृत्ती अर्जांची बिले तयार करण्यास विलंब होत आहे.