प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – संजय गाधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांसह विविध लाभार्थींना जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करून देखील उत्पन्नाचे दाखले सादर न केल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकांना अनुदान मिळण्यास अडचणी येणार आहे. शहरात या दोन्ही योजनेचे मिळून सुमारे सात हजाराहून अधिक लाभार्थी आहेत. त्यापैकी फक्त 43 टक्के लाभार्थींना हे अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील निराधार नागरिकांना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनेंतर्गत दरमहा पेन्शन दिली जाते. त्यासाठी दरवर्षी एक एप्रिलनंतर पात्र असलेल्या लाभार्थींना नव्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना वर्षभर दरमहा अनुदान दिले जाते. या लाभार्थींनी वेळेत उत्पन्नाचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच त्यासाठी विशेष शिबिरांचे देखील आयोजन करण्यात आले. परंतु लाभार्थींकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे 50 टक्क्यांहून अधिक लाभार्थींना या पेन्शनपासून वंचित राहावे लागणार असल्याचे समोर आले आहे.