शाळांमधील संच मान्यता दुरुस्तीबाबत : संबंधितांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार
पुणे – राज्यातील माध्यमिक शाळांमधील संच मान्यता दुरुस्तीबाबतचे विभागनिहाय प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण संचालनालयास सादर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार संबंधितांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे.
जिल्ह्यांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पद संख्या निश्चित करण्यासाठी संच मान्यता तयार करणे आवश्यक असते. यानुसारच शाळांना अनुदानही मिळत असते. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात संच दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्यात येत असतात. काही प्रस्ताव थेट शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थेकडून संचालनालयास सादर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांना योग्य त्या सूचना देण्याबाबतचे आदेशही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी आदेश बजाविले होते.
शिक्षणाधिकारी कार्यालयांकडून बरेचशे वाढीव पद मंजुरीबाबतचे प्रस्ताव व प्रस्तावांची पडताळणी न करता दुरुस्त न होऊ शकणारे प्रस्तावही संचालनालयास सादर करण्यात आले आहेत. यापुढे प्रस्तावाची पडताळणी करून नियमानुसार दुरुस्ती होणारे प्रस्तावच सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पुणे विभागातील प्रस्ताव सादर करण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजीची मुदत देण्यात आली आहे. मुंबईसाठी 13 नोव्हेंबर, कोल्हापूरसाठी 14 नोव्हेंबर, लातूरसाठी 15 नोव्हेंबर, औरंगाबादसाठी 16 नोव्हेंबर, नाशिककरिता 18 नोव्हेंबर, अमरावतीसाठी 19 नोव्हेंबर, नागपूरकरिता 20 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. मुदतीमध्ये शाळांच्या प्रतिनिधींनाही उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना द्याव्यात, असे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना बजाविण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.
मूळ प्रस्तावांसह उपस्थित राहणे आवश्यक
जिल्ह्याशी संबंधित संचमान्यता दुरुस्तीबाबतचे प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्राय व आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रस्तावांमधील दुरुस्तीसंदर्भात मूळ प्रस्तावांसह संचालनालयामध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे.