सध्या जरी भारतात तरुणांची संख्या भरपूर असली, तरी वृद्धांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. 22 ऑगस्ट हा ज्येष्ठ नागरिक दिन मानला जातो. त्यानिमित्त…
स.2013 साली महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण आले. यामध्ये अनेक सेवांची तरतूद केलेली आहे. बससेवा, रेल्वेसेवा यांमध्ये सूट दिलेली आहे. शिवाय सरकारने आर्थिक सुरक्षा धोरण, जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन या योजनांचाही समावेश केला आहे. या आर्थिक सुविधा मिळणे महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर आपुलकी, मानसिक आधार यांचीही वृद्धापकाळी जास्त गरज भासते. अँथनी पॉवेल या सुप्रसिद्ध लेखकाचे “दिवसेंदिवस वृद्ध होत जाणे म्हणजे न केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगण्यासारखे आहे.’ अशा अर्थाचे वचन कधीकधी बरोबर वाटू लागते.
बरेचदा असे होते की, कालपरवापर्यंत चांगली तब्येत असते, आपल्या पद्धतीने काम करून नाव कमावलेले असते, कर्तबगारी दाखवलेली असते… आणि अचानक अशी वेळ येते की, स्वतःची ओळख, कर्तृत्व यांऐवजी आपण कुणाची तरी आज्जी होतो. कुणाचे तरी आईवडील म्हणून आपली ओळख करून दिली जाते. आतापर्यंत आपण आपले आयुष्य आपल्याभोवती वळवलेले असते, विणलेले असते. जबाबदाऱ्या पार पाडताना आपला आत्मसन्मान सुखावत असतो. पण नंतर हळूहळू घरात इतर कर्तबगार मंडळींचा राबता वाढतो. आता त्यांची सोय महत्त्वाची ठरते.
आपल्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात पण घरातल्या इतर लोकांना काय हवे आहे, त्यानुसार आपण वागावे अशा अपेक्षा सुरू होतात. वय झाल्यावर बाहेर जाऊन भटकंती करणे, रात्री अपरात्री बाहेर जाऊन मनोरंजनाचे कार्यक्रम बघणे इ. शक्य नसते. मग गप्पा माराव्यात, आवडते छंद जोपासावेत असे वाटू लागते. इतके दिवस इतरांसाठी केले, सतत कामे करत राहिलो; आता आपल्याला काय आवडते ते पाहावे असे वाटते आणि त्याच वेळी घरातल्या तरुणांना वाटते, आमची एवढी धावपळ चालली आहे;
थोडी घरात मदत केली तर काय बिघडेल? यातून संघर्ष टाळून थोडेथोडे दोन्ही बाजूंनी विचार करून मार्ग काढणे आवश्यक असते आणि हे काम पालक व मुले यांच्या सुसंवादातूनच साधता येईल. काहीजण वाद नको म्हणून आपल्या सर्व आवडीनिवडी बाजूला ठेवून मुलं सांगतायत तसं जगू लागतात. यातून ज्येष्ठांच्या मनात निराशा, एकाकीपणा साचत जातो. काही वेळा ज्येष्ठ मंडळी बेफिकीर होऊन जास्तच मनमानी करू लागतात. ही दोन्ही टोके घातक.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ द्यायचा नसेल तर तरुण पिढीनेही वृद्धांना समजावून घेतले पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य हवे, आराम हवा, आवडीच्या गोष्टी हव्यात; तशा आपल्या आईबाबांनाही त्या हव्या असणार हे त्यांनी जाणून घ्यायला हवे. अनेकदा माणूस म्हातारे झाले म्हणजे त्याने फक्त इतरांच्याच सुखाचा विचार करावा, संन्यस्त वृत्तीने जगावे असे तरुणांना वाटते.
काहीजण तर आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना तसे सांगतातही, “आता तुम्ही फक्त आशीर्वाद देण्यासाठी तोंड उघडायचे.’ ज्येष्ठांना वाटते, असे का? लहानपणी तुम्हाला आधार हवा होता, तेव्हा तो आम्ही तुम्हाला दिला. तुमची सुख-दुःख, यशापयश, मानापमान सगळी स्वतःची समजून भोगली आणि आता अचानक एकटे व्हायचे? एकटेपणाने जगायचे? हे शक्य असते का? म्हणून घरातील वयस्क लोकांच्या मानसिक, शारीरिक गरजा मुलांनी नाकारू नयेत.
आताच्या कायद्यानुसार आईवडील दोघांचीही देखभाल करणे पाल्यांना बंधनकारक आहे. अशी देखभाल होत नसेल तर ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरणाकडे अर्ज करू शकतात. न्यायाधीकरणाने काढलेल्या फर्मानाकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केले तर पाल्यांना शिक्षाही होऊ शकते. काही वेळा आपण म्हणतो की, अशा गोष्टींसाठी कायदे कशाला… पण प्रत्यक्षात सामाजिक संस्थांकडे अनेक ज्येष्ठ नागरिक तक्रारी घेऊन येत असतात. कायद्याचा आधार, आर्थिक आधार हा जगण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. प्रत्येकालाच न्याय मिळवण्याचा हक्क आहे.
आताच्या तरुणांना आधीच्या पिढीपेक्षा जास्त ताणतणावांना तोंड द्यावे लागते. मुलांना वाढवणे हे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही हेही खरे. पण यातून अखेर एकमेकांशी ोलून, थोडे नमते घेऊन मार्ग काढणेच योग्य. बाहेरच्यांसमोर आपण संयम बाळगतोच ना, आपल्या मतांना मुरड घालतो ना, मग आपल्या घरातल्या माणसांसाठी, घर टिकावे म्हणून सामंजस्याचे धोरण अंगीकारण्यात कमीपणा कसला? मात्र अनेकदा असे होते की, जो पडते घेतो, त्यालाच चेपले जाते.
असे तर आपल्याकडून होत नाही ना, याची दोन्ही बाजूंनी काळजी घ्यायला हवी. कुटुं न्यायालयात एक वाक्य वाचलेले आठवते, “संसार म्हणजे एकानं पसारा करायचा नि दुसऱ्यानं आवरायचा.’ किंवा असंही म्हटलं जातं, “कुणीतरी समजुतीनं घ्यायला नको का?’ पण प्रश्न इथेच येतो. प्रत्येक वेळी एकानंच पसारा करायचा आणि तो आवरण्याची जबाबदारी दुसऱ्यानंच घ्यायची तर त्याची चिडचिड होणारच. दरवेळी एकानं आक्रस्ताळेपणा करायचा आणि दुसऱ्यानंच समजुतीनं घ्यायचं म्हटलं तर कधीतरी दुसऱ्याचीही सहनशक्ती संपतेच.
म्हणून दोन्ही बाजूंनी याचं भान ठेवलं पाहिजे. मोठ्यांनीही आणि लहानांनीही. पिढ्या वेगळ्या आहेत, संस्कार वेगळे आहेत; तरीही आपण एकाच घरातले आहोत, ही आपलीच माणसं आहेत हे ध्यानात ठेवून जर एकमेकांशी वागताना जाणीवपूर्वक, थोडी काळजी घेऊन वागले तर ज्येष्ठांचे मावळतीचे दिवस सुसह्य होतील.
माधुरी तळवलकर