उजेडाची वाट शेवटी मिळते अंधाराला…
जीवनसंध्या हाची विसावा प्रत्येक त्या सजीवाला
जीवनसंध्या म्हणजे आयुष्य जगता जगता अनेक अवस्था पार क रत अचानक उभी ठाकलेली संध्याकाळ, अर्थातच आयुष्याची उतरण. जीवनाला लागलेली ही उतरती कळा म्हणजेच जीवनसंध्या होय.
जीवनाचा अथांग सागर पार करत आयुष्याची अभेद्य नौका असंख्य अडथळ्यांना लांघत आपल्या अखेरच्या मुक्कामास पोहोचलेली असते. तेव्हा आयुष्याच्या क्षितिजावरती जीवनसंध्येचं काळसर गडद प्रतिबिंब उमटू लागलेलं असतं. आयुष्याची ही पानगळ म्हणजेचं जीवनसंध्या होय.
जीवन म्हणजे जगण्यासाठीची वणवण. भाकरीच्या शोधात अहोरात्र चालणारा माणसाचा संघर्ष, अर्थातच जगणे सुलभ करण्यासाठी करावी लागणारी धडपड.
चिवचिवणाऱ्या पाखरांच्या किलबिलाटासवे सुरू होणारी आयुष्याची ती सकाळ अन् पोटासाठी सुरू झालेली सजीवांची ती धडपड खरंच खूप संघर्षमय आणि अनाकलनीय. सृष्टीचं हे जीवनचक्र अगदीचं अद्भुत आणि अनोखं. भाकरीच्या शोधासाठी पावले चालू लागतात झपझप आपली वाट… सूर्याचं तेज व वाऱ्याची गती घेऊन अविरतपणे.
तेव्हा सूर्योदय ते सूर्यास्त या दैनिक कालचक्रानुसार जगण्याची उर्मी पायातील बळ वाढवत राहते सदाकदा अन् देत राहते मंत्र पुढे जाण्याचा. तेव्हा आपसुकच पायात व भुजांत प्रचंड बळ घेऊन माणूस पुढे पुढे सरकत राहतो अनेक अडथळ्यांना पार करत. आयुष्य जगण्याचा सुरेख मोह कोणालाही टाळता न येणारा असाच. कारण प्रत्येक मनुष्याला आपलं जीवन भरभरून जगण्याची अभिलाषा आपसूकच प्राप्त झालेली असते.
स्वतःच्या ऐहिक सुखासाठी जगण्याच्या या स्पर्धेत टिकून राहता यावं म्हणून माणसाची प्रचंड धडपड सुरू असते. या दरम्यान, अनेक चांगले वाईट कर्म त्याच्या हातून घडून जातात. तेव्हा मात्र आयुष्याचा लेखाजोखा वाचण्याचाही त्याला वेळ नसतो. किंबहुना कामाच्या व्यापात तो तशी तसदी देखील घेऊ शकत नाही.
सूर्याच्या गतिमान चक्रासवे आयुष्य पुढे सरकत राहतं. काम करण्याची, स्वतः झिजण्याची क्रयशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. मनाचे चक्षू धाडदिशा उघडू लागतात. विचारांचं भयग्रस्त वादळ मनाला बेचैन करू लागतं. आयुष्याची नौका एका वेगळ्या किनाऱ्याला लागलेली असते. कदाचित संध्या समय समीप आलेला असतो. तेव्हा मात्र आयुष्याच्या उतरतीला लागलेले असंख्य जीव आपल्या जीवनातल्या बेरीज-वजाबाकीचे गणित सोडवण्यात मश्गुल झालेले असतात.
सुख-दुःखाचे पाढे वाचत चिरशांतीच्या शोधात अनंत विश्वाच्या सुखमय प्रदेशात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी… आयुष्याची अविरत सुरू असलेली नौका आपल्या किनाऱ्यावर लागलेली असते. आता तिचा वेग पूर्वीसारखा न राहता काहीसा मंदावलेला असतो. अर्थातच जीवनसंध्या चिरशांतीचा विसावा घेऊन आपली काळीकुट्ट गडद छाया पसरवून अंतस्थ जीवांना आपल्या बाहूत ओढण्याच्या प्रयत्नात असते.
मी शोधत राहतो जीवनसंध्येच्या याच प्रवासातील असे असंख्य प्रवासी अन् त्यांचा आयुष्याच्या मुक्कामाप्रत पोहोचण्याचा संघर्षमय प्रवास. असंख्य जीवांची जगताना होत असलेली तगमग, कुचंबणा, आपल्याच घरात होत असलेली कुण्या अभागी जीवाची मुस्कटदाबी, अडगळीत पडलेले जन्मदाते अन् विवंचनेत तडफडणारे अनाथ जीर्ण देह. अंधार कोठोडीत संधीप्रकाशाची वाट पाहात निरंतर कुठल्यातरी आशेवर आश्वस्त जगणारे निराधार जीव. अन् सोबतच शोधत राहतो त्यांच्या सुख-दुःखाच्या अनंत क्लिष्ट धाग्यांची वीण.
जीवनोदय ते जीवनसंध्या हे जीवनाच्या वाटेवरील वाटसरूचे महत्त्वपूर्ण टप्पे. वृक्षाला नवी पालवी फुटावी अन् चराचरात चैतन्य निर्माण व्हावे. जीवनोदयाचं देखील असचं काहीसं. नवीन जीवांचे आगमन याचप्रमाणे, नवचैतन्य व हर्ष प्रदान करणारे, तर जीवनसंध्या म्हणजे त्याच वृक्षाची ऋतुपरत्वे होणारी पानगळ. वर्षभर वाटसरूंना शीतल छाया देणारे हेच वृक्ष जेव्हा पानगळतीच्या दिशेने झुकू लागतात तेव्हा जीवनसंध्येचा गडद काळोख त्या वृक्षाच्या भोवती पसरू लागतो. तेव्हा हीच खरी येणाऱ्या सृजनाची नांदी असते.
जीवनसंध्येच्या या शोधात मनपटलावर उमटलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. आयुष्याच्या धाग्यांची क्लिष्ट गुंफण उकलू लागते. हळूहळू मनात साचलेल्या त्या अनाहूत भीतीचे मळभ दूर होऊ लागतात.जीवनसंध्येच्या या प्रवाहात माणूस निसंकोचपणे वाट चालू लागतो आपल्या अंत्य ध्येयाकडे. मुक्तीच्या दिशेने चालत जाताना आयुष्याला पुन्हा वाचत आत्मशुद्ध होऊन तो खुली करून जातो आपली वाट येणाऱ्या नवसृजनाच्या निर्मितीसाठी…
– विशाल कन्हेरकर