मुंबई : आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर यांच्याविषयी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे यांच्या लग्नातील एक फोटो मलिक यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. समीर वानखेडेंचा पहिला विवाह कधी आणि कुठे झाला होता याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.
समीर वानखेडेंचा पहिला विवाह गुरुवारी, ७ डिसेंबर २००८ रोजी रात्री आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिमधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. तसेच मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती. समीर यांची थोरली बहीण जास्मिन दाऊद वानखेडेंचे पती अजीज खानांनी यावी दुसरे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केलेली, असा दावा मलिक यांनी केला आहे.
Photo of a Sweet Couple
Sameer Dawood Wankhede and Dr. Shabana Qureshi pic.twitter.com/kcWAHgagQy— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
याचप्रमाणे नवाब मलिक यांनी एक फोटो ही ट्विट केला आहे. मलिक यांच्या दाव्यानुसार हा फोटो या निकाहमधील असून फोटोत दिसणारी व्यक्ती समीर वानखेडे आणि त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी आहेत.
समीर वानखेडे हे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम असल्याचा दावाही मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला. मात्र समीर वानखेडे यांनी हा दावा खोडून काढला होता. ” माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असे समीर वानखेडे यांनी मलिक यांनी पहिल्यांदा फोटो ट्विट केला तेव्हा पत्रक जारी करत म्हटले होते.
“मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले,” असे वानखेडे यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितले होते.
दरम्यान, मंगळवारी समीर वानखेडे यांनी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी आज मुंबईत येणार आहेत.