माधव विद्वांस
प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणांची कदर करणारे, बॅंक ऑफ बडोदाची स्थापना करणारे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे आज पुण्यस्मरण.(निधन 6 फेब्रुवारी 1939) त्यांचा जन्म 10 मार्च 1863 रोजी नाशिक जिल्ह्यातील कौळाणे येथे झाला. ब्रिटिश भारतातील एक आदर्श संस्थानिक म्हणून ते परिचित होते.त्यांना स्वतःला वाचनाची खूप आवड होती.त्यांचा स्वतःचा मोठा ग्रंथसंग्रह होता.
फिरते वाचनालय ही कल्पना त्यांनी राबवली. वाचनालयाच्या प्रसारासाठी व स्थापनेसाठी त्यांनी ग्रंथालय तज्ज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले होते. ते दहा वर्षे बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले. संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. त्यांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले व त्यासाठी “प्राच्य विद्यामंदिर’ संस्थेची स्थापना केली. सयाजीरावांनी “श्रीसयाजी साहित्यमाला’ व “श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. होतकरू विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण मिळावे म्हणून “कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी अनेक गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्यांनी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती. महाराजा सयाजीराव यांनी दादाभाई नौरोजी नामदार गोखले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पं. मदनमोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, कर्मवीर वि. रा. शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, न्यायमूर्ती रानडे या समाजधुरिणांना नैतिक व आर्थिक मदत केली होती.
अप्रत्यक्षपणे महाराजांनी क्रांतिकारकांना भरपूर मदत केली होती. ऑलिम्पिकची संधी साधून त्यांनी हिटलरची भेट घेतली होती. त्यांच्या सूचनेनुसार खेळाडूंनी बडोदे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून बडोद्याचा भगवा ध्वज बर्लिन येथे वापरला. योगी अरविंद हे त्यांच्याकडे सेवेत होते. त्यांनी त्यांना योगविद्या शिकण्यासाठी उत्तेजन दिले. अनेक लेखक, प्रकाशक, रंगकर्मी, शिल्पकार, चित्रकार तसेच उद्योजक यांनाही मदत केली. बडोदा संस्थानमध्ये बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा केल्या. अत्यंत पुरोगामी विचारांचे महाराज सयाजीरावांनी सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले होते.
अर्थकारणाची जाण असल्याने बॅंक ऑफ बडोदाची स्थापना हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे कार्य होते.त्यांना बॅंकेची परवानगी मिळविण्यासाठी आठ वर्षे प्रयत्न करावे लागले. शेवटी बॅंक स्थापन झाल्यावर त्यांनी 1908 साली तीन करोड रुपयांच्या ठेवी ठेवल्या, त्याच्या व्याजातून आपणच स्थापन केलेल्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे अशी व्यवस्था केली. अशा प्रजाहितदक्ष, विद्याप्रसारक महाराजांना अभिवादन.