नवी दिल्ली : पंतप्रधान अर्थसंकल्पाच्या आधारे अर्थमंत्री सितारामन यांना हटवू इच्छितात, असा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. कल्पनाशून्य असलेल्या सितारामन यांनी सादर केलेल्या निरर्थक अर्थसंकल्पाची सर्व जबाबदारी सितारामन यांच्यावरच ढकलून त्यांना हटवण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत असावेत. असे राहुल गांधी यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“अर्थव्यवस्था चांगलीच घसरली आहे आणि त्याबाबतचा दोष कसा टाळायचा याबद्दल आपण आपल्या मेंदूला नक्की शिणवत असाल. त्यासाठी कल्पनाशून्य निर्मलाजींनी सादर केलेल्या निरर्थक अर्थसंकल्पाचा उपयोग करावा. त्यांना हटवून त्यांच्यावर सगळा दोष ढकलून द्यावा. सगळी समस्या सुटेल,’ असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
देशाच्या अर्थकारणाच्या स्थितीबाबत राहुल गांधी नेहमीच पंतप्रधानांना दोष देत असतात. नोटबंदी आणि जीएसटीद्वारे पंतप्रधानांनी देशाच्या अर्थकारणाचे नुकसान केले, असे ते म्हणत असतात. निर्मला सितारामन यांनी केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही ठोस धोरणात्मक कल्पना किंवा ठोस उपाय योजना नव्हती, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.