संगमनेर, (प्रतिनिधी) – प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या मातीमिश्रीत वाळूच्या लिलावाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या कालावाधीत अनेक घडामोडी झाल्या. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने महसूल विभाग व पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर शेवटचा उपाय म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदनाद्वारे वाळूतस्करांपासून वाचवण्याचे साकडे घातले आहे.
तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील जोर्वे येथील प्रवरा नदीपात्रालगतच्या मातीमिश्रीत वाळूचा लिलाव झाला होता. या वाळूच्या ठेकेदारांनी प्रवरा नदीपात्रालगत क्षेत्र असलेल्या दिगंबर काकड या शेतकऱ्याला विनंती करून रस्ता देण्याची तसेच, शेतातील पाइपलाइन काढून घेण्याची विनंती केली होती. त्या मोबदल्यात नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली होती.
मात्र त्यांचे काम आटोपताच त्यांना भरपाईचा विसर पडला. एका पाइपलाइनवर शेती ओलिताखाली आणणाऱ्या काकड यांची उर्वरित पाइपलाइनही त्याच रस्त्याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाळू तस्करांनी तोडल्याने, दुग्धव्यवसाय करणाऱ्या या कुटुंबांची पिके करपली आहेत.
या अन्यायाची तक्रार देण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गेलेल्या काकड यांचे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले नाही. उलट त्यांच्यावरच बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने तसेच वारंवार होणाऱ्या दमदाटी व धमक्यांमुळे हे कुटूंब नैराश्येच्या गर्तेत सापडले आहे. यामागे स्थानिक राजकारणाचा प्रभाव प्रशासनावर असल्याचा आरोप काकड यांनी आजवरच्या घटनाक्रमामुळे केला आहे.
तहसीलदारांच्या आदेशानंतर तलाठ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामा न करता, सर्व काही आलबेल असल्याचा अहवाल दिला. पोलीस व महसूलच्या असहकार्यामुळे या कुटुंबाची ससेहोलपट होत असून, सुमारे ५० ते ५५ जनावरांच्या चारा, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच संबंधीत लोकांनी या कुटुंबाला मारहाण केल्याने दहशत अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काकड यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत या प्रकरणी लक्ष घालून न्याय देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, दिघे कुटूंबियांनी काकड यांच्याविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, असा अर्ज जोर्वे ग्रामस्थांच्या नावाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात केला आहे. या निवेदनावर सुनिल कारभारी दिघे यांच्या कुटूंबातीलच आठ जणांच्या सह्या असल्याने हे निवेदन वैयक्तिक आकसातून केल्याचा आरोप दिगंबर काकड यांनी केला आहे.
यावर काकड यांच्यावर केलेले वाळू तस्करीचे आरोप खोटे असून, बदनामी करण्यासाठी केलेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून तोडलेली पाइपलाइन जोडून द्यावी आणि न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.