श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणुका व्हाव्यात, या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाराकडे असल्यास तो मतदान करू शकेल.
काही देश विघातक शक्तींकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पारदर्शी मतदानाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी बेलापूर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे बोगस आधारकार्ड बनवून घेऊन या कृत्याचा पर्दाफाश केला आहे.
यामुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी या ओळखपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. याखेरीज बोगस मतदान टाळणे केवळ अशक्य असल्याची चिंता सुनील मुथा यांनी व्यक्त केली आहे.
या बोगस ओळखपत्रांचा वापर करून एसटी महामंडळालाही दरवर्षी लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचे बऱ्याच प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे असे बोगस ओळखपत्र वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यामार्फत हे ओळखपत्र बनवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. निवडणूक आयोगाने ही बाब गांभीर्याने घेऊन त्याकरता आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात, अशी मागणी सुनील मुथा यांनी केली आहे.