सोलापूर – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याप्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली. मात्र हा वाद सुरू असताना आता कॉँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सावरकरांबाबत मोठे विधान केले आहे. वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचल्यानंतर माझं मत बदललं असल्याचं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं. या विधानानंतर आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे ?
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं. सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पानं’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिलांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मला शंका निर्माण झाली आहे,” पुढे त्या म्हणाल्या, येणारी हजारो वर्षे हा देश महात्मा गांधी आणि नेहरुंचाच राहील. तो कधीच मोदी–सावरकरांचा होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी कर्नाटकात निवडणुकीवर देखील भाष्य केले. कर्नाटक निवडणूकांच्या प्रचारात सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचा सहभाग आहे. यावर बोलताना “कर्नाटकातील दावणगिरी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. या मतदारसंघात मी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. माझ्या निरीक्षणानुसार, सध्याचे वातावरण हे काँग्रेसला पुरक असून कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल,” असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.
दरम्यान, याआधी चंद्रपूरमध्ये एका सभेत प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी देखील सावकरांबाबत मोठं विधान केलं होतं. ‘बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? असा प्रश्न शिवानी वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता.