शिंदे वासुली -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अगदी जवळ असलेल्या चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील सावरदरी गाव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शुक्रवार (दि. 10) ते मंगळवार (दि. 14) पर्यंत जीवनावश्यक सेवा वगळून बंद ठेवणार असल्याचा निर्णय येथील ग्रामपंचायतीने घेतला आहे.
बंदच्या काळात गावात प्रवेश करणारे सगळे रस्ते, मंदिर व सामाजिक ठिकाणे पूर्णपणे बंद असणार आहे. बाहेरील व्यक्ती, पाहुणे, मित्रमंडळींना गावात येण्यास मनाई केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच संचारबंदी व लॉकडाऊनचे सर्व नियम पाळूनच सुरू असतील.
रस्त्यावर भटकंतीसाठी फिरणाऱ्या व गर्दी करणाऱ्या भाडेकरूंवर व नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा सरपंच रंजना गाढवे, उपसरपंच गणेश पवार यांनी दिल्याची माहिती ग्रामसेवक श्रीधर नाईकडे यांनी दिली.
भांबोली व वासुली स्थानिक ग्रामस्थांनी वासुलीफाटा परिसरात किराणा व भाजीपाला दुकाने बंद करून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.