सातारा -करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सातारा शहरात सुरू झालेल्या सवयभान उपक्रमातून लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्याला लोकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाद्वारे “मीच माझ्या सातारकरांचा रक्षक’ ही संकल्पना राबवून सातारकरांची काळजी घेतली जात आहे.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या राजेंद्र चोरगे यांच्या प्रयत्नांतून शहरातील विविध संस्था एकत्रित आल्या. पालिकेच्या सहकार्याने लोकांमध्ये जागृती करण्याबरोबरच आरोग्यासाठी पूरक सवयी अंगिकारण्यासाठी घराघारतून प्रबोधन केले जाऊ लागले. त्यासाठी काही स्वयंसेवकांच्या टीम तयार करण्यात आल्या. या टीममधील सदस्य घरोघरी तसेच विविध कार्यालयात जाऊन चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी लावून घेण्याविषयी लोकांना आग्रह करू लागल्या.
आहार, विहार, वर्तनाच्या सवयी तसेच मास्क वापरणे, साबणाने हात धुणे शारीरिक अंतर ठेवणे, मुले व वृद्धांची काळजी घेणे अशा बाबींचे प्रबोधन होऊ लागले. त्यासाठी पत्रके व स्टिकर्स तयार करण्यात आली आहेत. त्याखेरीज या उपक्रमाद्वारे लोकांच्या शरीराचे तापमान मोजणे व ऑक्सीजनची पातळी मोजून प्रत्येकाच्या मनात स्वतःच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याचे काम सुरू झाले.
हे स्वयंसेवक घरोघरी व कार्यालयांमध्ये जाऊन थर्मल मीटर व ऑक्सीमीटरच्या साह्याने लोकांची तापमान व ऑक्सीजनची मोफत तपासणी करीत आहेत. आजअखेर सातारा शहरातील 20 हजार घरांतून 80 हजार लोकांची तपासणी केली आहे, अशी माहिती श्री. चोरगे यांनी दिली. मास्क, अंतर, स्वच्छता, सकाकात्मकता यातून आरोग्यसंवर्धन यासाठी या उपक्रमातून प्रत्येक जण स्वतःबरोबरच इतरांचीही काळजी घेईल, यासाठी “मीच माझ्या सातरकरांचा रक्षक’या भूमिकेतून हा उपक्रम पूरक ठरू लागला आहे.
कार्यालयातही आणि फिरत्या वाहनांद्वारे तपासणी
ज्या शासकीय कार्यालयात रोजच लोक येण्याचे प्रमाण मोठे असते. अशा कार्यलयात “सवयभान’चे दोन स्वयंसेवक तैनात करून येणाऱ्या लोकांची तपासणी करणे व जागृी करण्याचेही काम या उपक्रमातून केले जात आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचप्रमाणे एका फिरत्या वाहनद्वारे एक टीम शहरामध्ये फिरून लोकांची तपासणी करत आहे. शहरातीस स्रवघटकांपर्यंत पोहचून करोनावर मात करण्याच्या या लढाईत “सवयभान’ उपक्रम वेगळ्या सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घेत आहे.