अरुण गोखले
श्रावणाचा महिना आला की घरात या वर्षी सत्यनारायणाची पूजा कधी करायची? हा विषय सुरू होतो. प्रामुख्याने अनेक घरांमधून वर्षाकाठी एक तरी सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे केली जातेच. त्यासाठी श्रावण महिनाच विशेषत्वाने निवडला जातो.
आता हे सत्यनारायणाचे व्रत, ही पूजा का केली जाते, तर आपल्या मानवी प्रयत्नांना ईश्वरी कृपेची जोड मिळावी. वास्तविक चांगले शिक्षण, उत्तम नोकरी, गृहदक्ष पत्नी लाभावी, घराचं गोकुळ व्हावं आणि घरात धनधान्य, संपत्ती, संतती लाभावी ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते. पण अनेक वेळा या साध्या गोष्टीसुद्धा मनासारख्या घडत नाहीत, मिळत नाही हे कटू सत्य जेव्हा आपण पाहतो, प्रसंगी अनुभवतोही. त्यावेळी आपल्याला देव आणि दैव या दोन्ही गोष्टी आठवतात. दैव बदलणे हे आपल्या हातात नसल्याने आपण देवाकडे धाव घेतो. त्यातून आपल्याकडच्या व्रत आणि वैकल्यांचा उदय झालेला आहे.
आपल्याला जीवनात अपेक्षित असलेले सुख, समाधान, वैभव आणि शांती लाभावी यासाठी सत्यनारायणाचे व्रत, सत्यनारायणाची पूजा हा एक प्रभावी उपाय आहे.
सत्यनारायणाच्या पोथीच्या पहिल्या अध्यायातच या गोष्टीस पुष्टी देत असे सांगितले आहे की, नारदमुनींनी विष्णू भगवंतांना जेव्हा असे विचारले की, “”हे प्रभू! या कलियुगात माणसांची दु:ख दूर करणारा, त्यांना सुख, शांती, समाधान, मनोकामनांची पूर्ती करणारा एखादा छोटा उपाय असेल तर तो तुम्ही सांगा.” त्यावर भगवान विष्णूंनी कलियुगात शीघ्र फलदायी ठरणाऱ्या श्री सत्यनारायणाची पूजा करावी, म्हणजे त्याच्या कृपेने त्यांची मनोकामना पूर्ती, संरक्षण, संवर्धन आणि सुख, सौख्यलाभ त्यांना प्राप्त होईल, असे सांगितले आहे.
आपण जर आपल्याच जीवनाकडे द्रष्टेपणाने पाहिले तर या गोष्टींचा अनुभव आपल्यासही आलेला आहे, हे लक्षात येते. शिक्षण पूर्ण व्हावे, नोकरी मिळावी, लग्नकार्य व्हावे, इच्छापूर्ण व्हाव्यात, या संकल्पाने आपण आजवर ही व्रतपूजा करीत आलो आहोत.
आपली ही पूजा दोन कारणांसाठी असते. एक इच्छापूर्तीसाठी आणि दुसरी इच्छापूर्तीच्या कृतज्ञतेतून, अर्थात बोललेल्या नवसाच्या पूर्ततेसाठी केलेली पूजा. जे लाभले नाही ते लाभावे आणि जे लाभलेय ते वृद्धिंगत होऊन कायम टिकून राहावे म्हणून श्रावणातली सत्यनारायणाची पूजा करतात.