पुणे – विभागातील कनिष्ठ महाविद्यालये व खासगी क्लासचालक यांचे “टाय-अप’ असल्याने विद्यार्थी महाविद्यालयांऐवजी खासगी क्लासमध्ये उपस्थित राहतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये अक्षरश: ओस पडू लागली आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने आता कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थितीचा निर्णय घेतला आहे.
प्रामुख्याने शहरी भागांत गल्लोगल्ली खासगी क्लासचालकांनी “दुकाने’ उघडली आहेत. जेईई, नीट, सीईटी यांसारख्या परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचा ओढा क्लासकडे दिसतो. हे क्लासचालक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी वसूल करतात. कनिष्ठ महाविद्यालये व खासगी क्लासचालकांचे संगनमत असते. विद्यार्थी प्रवेश महाविद्यालयात घेतात; अन् उपस्थित खासगी क्लासमधील लेक्चर्सला उपस्थित राहतात. महाविद्यालयात विद्यार्थी अनुपस्थित असले, तरी त्यांचे काहीच गांभीर्य वाटत नाही.
विद्यार्थी महाविद्यालयात केवळ प्रॅक्टिकलच्या वर्गांना जातात. अन्य तासांना विद्यार्थी फारसे कधीच बसत नाहीत. महाविद्यालयातील शिक्षकांनी नियमितपणे व्यवस्थित वर्ग घेतल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाबत नक्कीच आवड निर्माण होईल व यातून विद्यार्थ्यांची उपस्थितीही आपोआपच वाढणार आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, प्रत्यक्षात तेवढी उपस्थिती बहुसंख्य महाविद्यालयात आढळून येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकामार्फत काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.
“कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या वारंवार तक्रारी येत असतात. यांची दखल घेऊन कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थिती प्रत्यक्ष तपासण्याबाबत पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश दिले आहेत.” – संपत सूर्यवंशी, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग