इतर गुन्ह्यातून पोलिसांना मिळाली मुक्तता
भवानीनगर- गेल्या एक महिन्यात लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळातील गुन्हे सोडून इतर गुन्ह्यातून पोलिसांना मुक्तता मिळाली असल्याचे पहावयास मिळाले आहे. पोलिसांना कायमच कामाचा ताण असतो. परंतु लॉकडाऊनच्या काळात खाकीला समाधान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलीस ठाण्यामध्ये साधारण नियमित काळात एका महिन्यामध्ये सरासरी 35 ते 40 विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असल्याचे चित्र होते. परंतु करोना सारख्या रोगाचे देशावर संकट आले या संकटातून बाहेर निघण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. या काळात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे विनाकारण बाहेर फिरणारे त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये पोलीस ठाण्यात मागील काळामध्ये ज्याप्रमाणे इतर गुन्ह्यांची नोंद घेतली जात होती. त्या गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये लॉकडाऊनच्या काळात निम्म्याहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये हाणामारी, चोरी, अपघात व इतर अनेक प्रकारच्या गुन्ह्यात घट झालेली दिसून येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात या गुन्ह्यांमध्ये घट होऊन निम्म्यापेक्षाही कमी गुन्हे दाखल झाले आहेत. यातून जरी पोलिसांना थोड्याफार प्रमाणात मुक्तता मिळाली असली तरी याहीपेक्षा कितीतरी पटीने देशावर आलेल्या करोना संकटाचा सामना करण्यासाठी पोलीस अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पोलीस यंत्रणा चोख कर्तव्य बजात आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अतिशय महत्त्वाची भुमिका बजावत आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीच्या एक महिन्याच्या काळामध्ये सर्व नागरिक आपापल्या पद्धतीने प्रशासन व सरकारला सहकार्य करत आहेत. नागरिक घरी थांबून राहिल्याने पोलीस ठाण्यामध्ये होणाऱ्या गुन्ह्यात मोठी घट झाली आहे. नागरिकांनी योग्यप्रकारे लॉकडाऊन पाळणे व घरी राहणे पसंद केल्यानेच या काळात कमी प्रमाणात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाल्याचे चित्र आहे.
- पोलिसांच्या कार्याचे जनतेकडून स्वागत –
देशावर करोना या विषाणूजन्य रोगाचे संकट आले आहे. त्याला हरवण्यासाठी जनतेने काटेकोरपणे नियमांचे पालन करत सहकार्य केले. पोलिसांनी केलेल्या कार्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे. इंदापूर तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण अध्याप आढळलेला नाही. वालचंदनगर पोलीस ठाण्यात इतर गुन्हे दाखल होण्यामध्ये घट झाली असली तरीदेखील लॉकडाऊनच्या काळात शंभरच्या दरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. - लॉकडाऊन काळात तर पोलिसांना आपले स्वतःचे कुटुंब जपून जनतेसाठी अहोरात्र काम करावे लागले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर तर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. देशावर आलेले संकट आल्याने पोलीस यंत्रणेला देखील अहोरात्र काम करावे लागले. नागरिकांनी साथ दिल्याने आम्ही समाधानी आहोत.
– दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालचंदनगर.