लोणी काळभोर – हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यांतील 66 हजार हेक्टर्स क्षेत्रावरील शेतीला कालव्याद्वारे पाणी मिळणे कठीण दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिकांना पाणी कसे द्यायचे, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
या तालुक्यांतील 66 हजार हेक्टर्स क्षेत्रावरील पिकांना मुठा उजव्या कालव्याद्वारे पाणी पुरवठा होतो. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांतील पाणी कालव्यामधून तीन तालुक्यांतील शेतीला व पुणेकरांना पिण्यासाठी पुरविले जाते. काही वर्षांपूर्वी पुणे शहराची लोकसंख्या कमी होती. त्यावेळी साडेसहा टीएमसी पाणी पुरेसे होते. यानंतर तत्कालिन आघाडी सरकारने पुणे शहराच्या पाणी कोट्यात वाढ करून ते साडेअकरा टीएमसी केले. आता ते चौदा टीएमसीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे शेतीला उपलब्ध होणारे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण असा नवीनच वाद यामुळे उभा राहिला आहे.
तीन धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रमाणात खडकवासला धरणातून शेतीला व पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. शेतीला सोडण्यात येणारे कालव्यातील पाणी काही दिवसांनंतर बंद करण्यात येणार आहे. पुढील काळात अजून एक आवर्तन सोडावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे शहरातील पाणी राखून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणे अवघड आहे. त्यामुळे पावसाळा येईपर्यंतचे पुढील काही महिने शेतकऱ्यांसाठी कसोटीचे असणार आहेत.
तीनही तालुक्यांत कालव्याच्या कडेला बहुतेक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. कालव्याला पाणी असल्यानंतर विहिरींना भरपूर पाणी असते. कालव्याला जर महिन्यापेक्षा जास्त काळ पाणी नसल्यास बहुतेक विहिरी कोरड्या पडण्याच्या
मार्गावर असतात.
जलशुद्धीकरण प्रकल्प शोभेचे बाहुले
जलसंपदा विभागाशी झालेल्या करारानुसार पुणे महानगरपालिकेने मुंढवा येथे नदीकिनारी जलशुद्धीकरण (?) प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पातील पाणी जुन्या कालव्यात सोडले जाते. जुन्या कालव्यातील पाण्यामुळे हवेली व दौंड तालुक्याच्या काही भागातील शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, हा पाणीपुरवठा वरचेवर बंद असतो. याकडे लक्ष देऊन हा पाणी पुरवठा सतत चालू राहील, या दृष्टीने पुणे मनपाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेने 892 एमएलडी पाणी उचलावे असा आदेश दिला आहे. मात्र, राजकीय बळाचा वापर करून मनपा जादा पाणी उचलत आहे. महापालिकेने मापदंडानुसार पाणी उचलले तरच या तीन तालुक्यांतील शेतीला उन्हाळ्यात एक आवर्तन मिळेल. अन्यथा तिन्ही तालुक्यांतील पिके जळून जाणार आहेत.