सोलापूर -अजित पवार यांच्याकडे काल सरकारी पाहुणे येऊन गेले. मात्र या सरकारी पाहुण्यांची आपल्याला चिंता नाही. निवडणुकीच्या अगोदर मला ज्यांनी ईडीची नोटीस दिली, त्यांना राज्यातील जनतेने येडी ठरवले. त्यामुळे सरकारी पाहुण्यांची चिंता नसल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजपवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ज्यांच्या हाती सत्ता आहे.
त्यांच्याकडून होत असलेला दुरुपयोग सर्वांना दिसत आहे. केंद्र सरकार आज देशातील रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचे काम करत आहे. पंडित नेहरू यांच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला. परंतु मोदी सरकार या सर्व गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात देत चालले आहे. केंद्राकडून दळणवळणाची साधने, विमानतळ, तसेच बंदर या सर्व गोष्टींचे खासगीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले जात असल्यामुळे
देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
एकूणच केंद्र सरकारची नीती ही महागाईला निमंत्रण देणारी ठरत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान बऱ्याच दिवसानंतर आपण आज सोलापूरला आलो आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मोठ्या प्रमाणावर आपली पळापळ सुरू होती. त्यावेळी अनेक लोक राष्ट्रवादी सोडून गेले होते. यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत होती. त्यावेळी भाजपाचे सरकार येणार असे सर्वांना वाटत होते.परंतु आज उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले आहे, असे शरद पवारांनी सांगितले.
शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे काय?
शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या आहेत.ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांबद्दल नेमकी आस्था आहे काय? याची सर्वांना चिंता लागून राहिली आहे. शेतकऱ्यांविषयी आस्था असती तर शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची हत्या केली नसती. शेतकऱ्यांची हत्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या या भाजप सरकारला विरोध करण्यासाठी “महाराष्ट्र बंद’चा निर्णय घेतल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.