सातारा -जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. आता निवडणूक झाली तरी 21 पैकी 18 जागा राष्ट्रवादीच्या येतील. अशी परिस्थितीत असताना बॅंकेत पक्षविरहितच्या नावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जर भाजपचे आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना समवेत घेऊन पॅनेल करणार असतील तर त्याला माझा विरोध राहणार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
दरम्यान, आ. शशिकांत शिंदे यांना जावळी तालुक्यातून धोका असल्याने त्यांनी जिल्हास्तरावरुन बॅंकेच्या निवडणुकीत उतरुन जावळीचा हट्ट सोडावा, असेही पवार यांनी सांगितले.
दीपक पवार म्हणाले, “जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सर्वपक्षीय पॅनेलचा विचार सातत्याने मांडला आहे. शिवेंद्रसिंहराजेंना बरोबर घेऊन सर्वपक्षीय आघाडी होणार असेल तर त्याला माझा विरोध राहणार असून ही बाब मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याही कानावर घातली आहे. ज्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने शिवेंद्रसिंहराजेंनी अनेक वर्षे सत्ता भोगली.
त्याच पवारांना पाठ दाखवून ते निघून गेले. असे असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीची नेतेमंडळी त्यांना समवेत घेत असेल तर हा शरद पवारांचा अवमान आहे.’ राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन दोन वर्षे झाली तरी जिल्हा बॅंकेत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे अध्यक्ष कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जाणीवपूर्वक ईडी, प्राप्तीकर विभागाची कारवाई करुन चौकशीचा ससेमिरा मागे लावला जात आहे. भाजप सहकार बुडवायला निघाले आहे, असे असताना त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये घेतले तर ती आपली चूक ठरणार आहे.
जिल्हा बॅंकेचे तीन ते चार मतदारसंघ सोडले तर महाविकास आघाडीची घट्ट पकड आहे. निवडून येणारे सर्व उमेदवार आपले असतील तर सरकारविरोधी भाजप आमदारांना पॅनलमध्ये का घ्यावे, असा प्रश्न पवार यांनी केला. जिल्हा बॅंक व सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी मुंबईत चर्चा केली.
“महाविकास’च्या नावाखाली नगरपालिका अथवा जिल्हा बॅंक निवडणूक झाली तर फार चांगली बाब असून त्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. जावळी तालुक्यातील परिस्थिती बदललेली असल्याने येथील लोक आता बदलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी जिल्हा पातळीवरील मतदारसंघाचा विचार करुन जावळीचा हट्ट सोडावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजितदादांनी काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. भाजपच्या आदेशाने ईडी त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देत आहे. अन्य नेत्यांवरही ईडी, प्राप्तीकर खात्याच्या धाडी पडत आहेत. या सर्व कारवाया सुडबुध्दीने आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप काम करत आहेत आणि साताऱ्यात आपण त्याच पक्षाच्या आमदारांना सर्वपक्षीयमध्ये येण्यासाठी निमंत्रण देत आहेत,’ हे पक्षाला मारक ठरेल, अशी भीती दीपक पवार यांनी व्यक्त केली.
शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागत
उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात आले की शिवेंद्रसिंहराजेंना भेटल्याशिवाय जात नाहीत. शिवेंद्रसिंहराजे मुंबईत गेल्यावर अजित पवारांना भेटल्याशिवाय परत येत नाहीत. त्यांनी सर्वपक्षीय पॅनलमध्ये यावे म्हणून त्यांचाच पुढाकार आहे. मग तुम्ही शिवेंद्रसिंहराजेंना विरोध का करता, या प्रश्नावर दीपक पवार म्हणाले, ‘शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीत यावे. त्यावर माझी काहीच हरकत असणार नाही. उलटपक्षी ते जर राष्ट्रवादीत आले तर मी त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वात पुढे मी असेन.’