सातारा – निवडणुका जवळ येताच स्वत:च्या स्वार्थापुरते बसून चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ज्यावेळी स्वत:चा स्वार्थ येतो, त्यावेळी बसून चर्चा करण्याच्या गोष्टी सुरु होतात. पण आता आम्हाला कोणतीही चर्चा करायची नाही. सातारा पालिकेच्या बाबतीत गेल्या पाच वर्षात सातारकरांनी काम शून्य अन् नुसता भ्रष्टाचार, नुसती टक्केवारी असले उद्योग पाहिले आहेत. आता सातारा पालिकेत स्वत:चा पराभव दिसायला लागल्यानेच चर्चेचा साप सोडायचे उद्योग चालू आहेत, अशी जोरदार टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली.
कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने खिंडवाडी (ता. सातारा) येथे दर रविवारी जनावरांचा बाजार भरवण्यास सुरूवात केली. त्याचा प्रारंभ करताना झालेल्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आम्हांला आमचं काम करायचं आहे. मार्केट यार्डमध्ये माझे काही वैयक्तिक काम नाही. येथे माझा एखादा गाळा किंवा परवाना नाही. त्यामुळे मी इथे काही व्यवसाय करणार आहे असं काहीच नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु असलेल्या कामांना सर्वांनीच पाठिंबा देणे गरजेचे असताना, काही विघ्नसंतोषी मंडळी उगाचच या कामात आडवे पडत दहशत निर्माण करत आहेत.
कायदेशीरदृष्टया बाजार समितीकडे सर्व अधिकार आहेत, हे आम्ही सांगत होतो. त्यावर सर्वोच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे येथे भाजी मंडई, भुसार व्यापाऱ्यांसाठी लवकरच सुसज्ज असे मार्केट यार्ड आम्ही करु. कुळांच्या विषयाशी बाजार समिती आणि आमचा काहीही संबंध नाही. आम्हाला शासनाने जागा संपादीत करुन दिली आहे. त्यापोटी असणारी नियमानुसारची रक्कम आम्ही भरली आहे. या जागेचे सर्व निकाल बाजार समितीच्या बाजूने लागले आहेत.
ज्या दिवशी बाजार समितीचे भूमिपूजन करण्यासाठी आलो, त्यावेळीही आमची भूमिका हीच होती. तुम्ही जे कायदेशीर आहे ते करा, उगाच दादागिरी, दडपशाही, दहशत करत असाल तर आम्ही असल्या कोणत्याही गोष्टींना भीक घालणार नाही. यानंतर या जागेचे मालक सर्वोच्च न्यायालयात गेले अन पहिल्याच सुनावणीत संपूर्ण प्रकरण डिस्मीस झाले. त्याचवेळी बाजार समितीचे अधिकार कायम ठेवले. आम्हांला शासनाने जागा दिल्यामुळे या जागेविषयी आता इतर विषय संपले आहेत, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.
युरोप दौऱ्यावरुन उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टिकेबद्दल शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, हा त्यांचा विषय आहे. जिल्हा बॅंकेत ते संचालक म्हणून निवडून आले. पण मिटींगलाही उपस्थित नसतात. त्यामुळे मिटींगलाही यायचं नसेल तर तेथे एखादा काम करणारा संचालक तरी आला असता. केवळ चालकाच्या पोराच्या बदलीसाठी बॅंकेत यायचं, एवढंच जर संचालकाचं काम असेल तर त्या संचालकांचे आम्ही ऐकायचं काही कारण नाही. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. नवीन गोष्टी आपल्या शेतीमध्ये कशाप्रकारे करता येवू शकतील, याबाबत युरोपचा अभ्यास दौरा होता. त्यामुळे त्यावर आणखी काही बोलणंच योग्य नाही.
भिडे गुरुजींचे वक्तव्य चुकीचे
संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केले, ते चुकीचे आहे. खरं तर त्या महापुरुषांनी केलेला त्याग, बलिदान पाहता त्यावर आपण बोलणे चुकीचे आहे. लोकशाहीमध्ये अधिकार दिले आहेत, याचा अर्थ कोणावरही बेतालपणे बोलणे चुकीचे आहे. यापूर्वी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयीही झाले होते. त्यामुळे सर्वांनीच महापुरुषांबद्दल बोलताना विचार केला पाहिजे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.