लोणंद – धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने लोणंद नगरपंचायतीसमोर उपोषणास बसलेल्या गणेश केसकर यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. धनगर आरक्षणाबाबत धनगड ऐवजी धनगर असे शिफारसपत्र राज्यपाल देत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत उपोषणकर्ते गणेश केसकर यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी खंडाळा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने गणेश केसकर उपोषणाला बसले आहेत. काल चौथ्या दिवशी देसाई, आ. पाटील, जाधव यांनी भेट दिली. त्यावेळी नितीन भरगुडे- पाटील, ऍड. शामराव गाढवे, विनोद क्षीरसागर, रमेश धायगुडे, तहसीलदार अजित पाटील, सपोनि सुशील भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, “”धनगर समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार निश्चितपणे प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याला यश येणार आहे. धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून लवकरच आरक्षणाची पूर्तता केली जाणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी आमचीही भूमिका आहे. परंतु टिकणारे आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कालावधी दिला तर योग्य प्रकारची कागदपत्रे तयार होतील.” गणेश केसकर यांनी उपोषण मागे घेण्याची विनंतीही देसाई यांनी केली.
मकरंद पाटील म्हणाले, “”धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे ही आपलीही भूमिका आहे. त्यासाठी विधानसभेमध्ये बहुतांश आमदारांनी शिफारस केली आहे. काही दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे.” तब्येतीची काळजी घ्यावी, टोकाची भूमिका न घेता उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आ. मकरंद पाटील यांनी केसकर यांना केली.
गणेश केसकर म्हणाले, “”शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांच्याबद्दल आदरच आहे. आतापर्यंत धनगर आरक्षणासाठी अनेक आंदोलने, उपोषण झाली. परंतु, सरकारकडून याबाबत केवळ आश्वासनच मिळाले. त्यामुळे आता आश्वासनावर न थांबता असा निर्णय होत नाही, राज्यपाल शिफारसपत्र देत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी समाज बांधवांची भूमिका आहे.”
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्यात यावे हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्याबाबतचे पत्र धनगर समाजाच्यावतीने शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांना देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती सुनील शेळके, शिवाजीराव शेळके, हनुमंतराव शेळके, संदीप शेळके, सचिन शेळके, सागर शेळके, ऍड. वैभव घायगुडे आदी मान्यवरांसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाच्या मागण्यांसाठी लोणंद मुस्लिम समाजाच्यावतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष महंमदभाई कच्छी, सचिव सत्तारभाई काझी, विश्वस्त हाजी युन्नुसभाई आतार, कय्युम मुल्ला, उद्योजक महंमदभाई मुल्ला, नवाबभाई चौधरी, आकिब कच्छी आदी उपस्थित होते.
धनगर बांधवांकडून नीरा नदीमध्ये आंदोलन
धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने धनगर आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील धनगर बांधव आज नीरा नदीवरील दत्तघाट याठिकाणी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करत आंदोलन केले. यावेळी सभापती सुनील शेळके, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, सत्वशील शेळके, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, गणेश शेळके, हणमंत शेळके, विजय धायगुडे, शंकर मर्दाने, गणेश धायगुडे, भगवान ठोंबरे, बाळासाहेब शेळके, राहुल धायगुडे, पवन धायगुडे, दादासाहेब धायगुडे, शशिकांत तरंगे, सचिन कुंडलकर, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक ईश्वर ठोंबरे, हिरालाल धायगुडे, संतोष डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी आंदोलकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आपल्या म्हणण्यावर ठाम होते. राहुल धस तसेच सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, उपनिरीक्षक विशाल कदम, कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.