देशभरात आले 165 लाख टन तेल; आंतरराष्ट्रीय बाजारात दर घटल्याने कमी खर्च
पुणे – आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव गेल्या वर्षभरात कमी होते. त्यामुळे आयातीवरील खर्चही कमी झाला. या स्थितीत भारताने सरत्या तेल विपणन वर्षात (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) तब्बल 165 लाख टन खाद्यतेल आयात केली आहे. हे प्रमाण विक्रमी ठरले आहे.
याबाबतचा अहवाल सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईएआय) नुकताच जाहीर केला आहे. मागील हंगामात याच काळात आयात 140 लाख टनांदरम्यान होती.
दरम्यान, खर्चाच्या बाबतीत विचार केल्यास यंदा खाद्यतेल आयातीवर 1 लाख 38 हजार कोटी रु., तर मागीलवर्षी हा खर्च 1 लाख 56 हजार कोटी रु. झाला होता. म्हणजेच खाद्यतेल आयातीवरील खर्च जवळपास 18 हजार कोटींनी कमी झाला. मात्र आयात 25 लाख टनांनी जास्त झाली.
दरम्यान, यंदा सप्टेंबरमध्ये खाद्यतेल आयात 15 लाख टन, तर ऑक्टोबरमध्ये जवळपास 10 लाख टन आयात झाली. तर, ऑक्टोबर-2022 मध्ये ही आयात जवळपास 14 लाख टन होती.
…म्हणून वाढली आयात
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या भावात झालेली घसरण. मागील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या भावात सतत घसरण होत गेली. कमी झालेले भाव आणि खाद्यतेलाची उपलब्धता यामुळे भारतात खाद्यतेलाची आवक वाढली. याचा परिणाम म्हणून भारतातील स्थानिक बाजारात तेलाचे भाव आवाक्यात राहिले आहेत.
देशात साठाही वाढला
मागील वर्षात खाद्यतेल आयात जास्त झाल्याने दरमहिन्यात देशातील स्टॉक जास्त राहीला. यंदा साधारणपणे ऑगस्टपासून देशात दरमहिन्याला किमान 30 लाख टन खाद्यतेलाचा साठा करून ठेवण्यात आला होता. तर, तेल वर्ष संपताच दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी देशात खाद्यतेलाचा स्टॉक 33 लाख टनांच्या दरम्यान उपलब्ध होता.