कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्याला दिशा आणि ज्या ठिकाणी जायचे ते स्थळ निश्चितपणे माहिती असते. जर आपले जाण्याचे ठिकाणच माहिती नसेल तर प्रवासाची दिशा आणि हेतू हरवून जातो व केलेला प्रवास निरर्थक ठरतो. कोणतेही कार्य करताना त्यामागील आपला हेतू आपण निश्चित करत असतो. विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण व्हायची असते म्हणून ते अभ्यास करतात, खेळाडू स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सराव करून स्पर्धेत सहभागी होतात, रुग्णांना आजारातून बरे करण्यासाठी डॉक्टर उपचार करतात अशी आपणास अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व उदाहरणांमध्ये हेतू महत्वाचा असल्याचे आपणास दिसून येईल.
प्रत्येक व्यक्तीचेही असे एखादे ध्येय असावे की जे साध्य करण्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्नशील राहील. ज्याचे आपल्या जगण्याचे ध्येय निश्चित नसते त्याची अवस्था समुद्रामध्ये दिशा भरकटलेल्या जहाजासारखी होते. समुद्रात भरकटलेल्या जहाजाला किनारा मिळण्यासाठी दीपस्तंभ (लाईट हाऊस) महत्वाची भूमिका बजावतो, तसेच मानवाच्या आयुष्यात ध्येयरुपी दीपस्तंभ नसेल तर आयुष्य रुपी समुद्राचा किनारा प्राप्त करणे अवघड जाते. माणूस तर जगत राहतो मात्र आपले ध्येय काय आहे, आपण काय साध्य करू शकतो याची जाणीव त्यांच्याकडे नसेल तर त्या माणसाची अवस्था ही समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखीच होते. ध्येय रुपी अढळ ध्रुवतारा असल्याशिवाय आयुष्याला दिशा प्राप्त होणार नाही. यामुळेच जीवनाचे एक ध्येय ठरवणे आपणास गरजेचे आहे. मग ते कसे असावे?
आपले ध्येय हे सुस्पष्ट असायला हवे, तरच ते गाठण्यासाठीचा रस्ता आपणास सापडू शकतो. सुस्पष्ट नसलेल्या ध्येयाची सिद्धता संपूर्णपणे होत नसते आणि ही सिद्धता संपूर्णपणे होण्यासाठी काय करावे लागेल याचीही स्पष्टता आपल्या प्रयत्नांमध्ये असत नाही. बरेच जण आपले शारीरिक वजन कमी करण्याचे ध्येय ठरवितात मात्र नेमके किती वजन कमी करायचे हे स्पष्ट करत नाहीत. हीच अवस्था व्यायामाच्या, वाचनाच्या, अभ्यासाच्या वेळेबाबतही घडते. नेमका किती वेळ या गोष्टींसाठी दिला जाणे आवश्यक आहे याची स्पष्टता निश्चित केली जात नाही. स्पष्ट ध्येयामुळे आपल्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम होतो आणि ध्येय सिद्धीकडे वाटचाल होते.
सुरुवातीला अत्युच्च ध्येय ठेवण्यापेक्षा थोडे सोपे आणि आपल्याला गाठण्यासाठी योग्य असेल असे ठेवणे कधीही चांगले, कारण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण प्रयत्नपूर्वक चढू शकेल इतक्या उंचीच्या असाव्यात. जर अतिउच्च ध्येय ठरवले तर त्यापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या जर मोठ्या असतील तर ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही आणि तुम्ही धडपडून पडाल आणि ध्येय निश्चिती केवळ बाष्कळ बडबड ठरेल. त्यामुळे जे साध्य होईल असे वाटते त्याच बाबी पूर्ण करण्याचे ध्येय सुरुवातीला ठेवा.
ते साध्य झाल्यानंतर असे ध्येय डोळ्यासमोर ठेवा की जे पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतांचा कस लागेल, शक्तीचा पुरेपूर वापर होईल. मोठे ध्येय समोर ठेवल्याने आपल्या अंगी कौशल्य आत्मसात होतात, तसेच आपला दृष्टिकोन विशाल होतो आणि समस्यांना व संकटांना सामोरे जावून त्यावर मात करण्याची हातोटी आपणास प्राप्त होते. मात्र हे मोठे ध्येय निवडताना ते वास्तवाला धरून असलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवावे. जे साध्य होण्यासारखे नाही अथवा अवास्तव आहे त्या ध्येयाचा पाठलाग करून आपली शक्ती आणि क्षमता व्यर्थ घालवण्यात काहीही शहाणपण नाही.
कठोर आणि आव्हानात्मक ध्येय ठेवल्याने ते पूर्ण करण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती आपल्याला अशा ध्येयाकडूनच प्राप्त होते. कोणतेही नवीन ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला वेगळे हटके असे काहीतरी नाविन्यपूर्णरित्या करावे लागते, मात्र हे हटके किंवा नाविन्यपूर्ण करण्यासाठी आपणास काही प्रमाणात अस्थिर व्हावे लागेल. आपली सुरक्षित जागा सोडावी लागेल. म्हणजेच आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडून द्यावा लागेल. पोपटाला आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर पिंजऱ्यातील आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडून पिंजऱ्यातून बाहेर पडावे लागेल, तरच तो त्याच्या मनाप्रमाणे आकाशात स्वच्छंदीपणे विहरत राहू शकतो.
‘कम्फर्ट झोन’ सोडण्याची आपली मानसिकता नसेल तर मात्र आपली अवस्था पिंजऱ्यातील पोपटासारखी होते त्यामुळे नवीन्यपूर्ण आणि हटके करण्यावर आपल्याला मर्यादा येतात. ध्येय सिध्दीसाठी सातत्याने प्रयत्न करत राहावे, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक एक पाऊल टाकत चलावे कारण हजारो मैलांचा प्रवास पहिल्या पाऊलापासूनच सुरू होतो. ध्येय तर निश्चित असेल तर पडलेले प्रत्येक पाऊल ध्येय सिध्दीकडे निश्चितच घेऊन जाईल. आपल्या ध्येयाचा पाठलाग करताना थांबू नका, कारण ‘थांबला तो संपला’. आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडा आणि एखाद्या नवीन क्षेत्रातील ध्येय शेतीचा अनुभव घ्या. चला तर मग, ध्येय ठरवूया आणि साध्य करण्यासाठी सदा सज्ज राहूया.
गेट… सेट… गो…