पिंपरी – नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटके व्हायला हवीत. प्रायोगिक व व्यावसायिक, बाल रंगभूमीला विशेष अनुदान राज्य सरकारने दिले पाहिजे. तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी, अशी अपेक्षा १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्धाटनप्रंसगी खासदार शरद पवार बोलत होते.
खासदार पवार म्हणाले की, चित्रपटसृष्टी आधी हजारो वर्ष सर्वाधिक प्रभावी माध्यम ही रंगभूमी होती. मात्रा आता जवळपास सर्व निर्माते कलाकार हे हिंदी चित्रपटाकडे वळत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी ओस पडत आहे. तसेच हल्ली डिजिटल माध्यमातही नाटके सादर होतात. मात्र त्यामध्ये रंगभूमीचा जीवंतपणा नसतो. सृजनशिल विषय घेऊन नाट्य निर्मिती होत असते. प्रत्यक्ष नाटक पाहताना आनंद मिळतो. हा आनंद सोशल मिडियाच्या जमान्यात सादर होणाऱ्या चित्रपटात देखील मिळत नाही. त्यामध्ये भावना नसतात. प्रेक्षक नाटकाकडे पुन्हा येतील, यासाठी कलावंतांनी प्रयत्न करावेत. नाटक सादर करताना अर्थाचा होणारा विपर्यास थांबविणे गरजेचे आहे. इतिहासाचे विकृतीकरण थांबवणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून खासदार पवार म्हणाले की, कलाकारांच्या मानधनात वाढ करणे, घरकूल देणे, नाट्यगृहाचे दर कमी करणे, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांना निधी देण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे असल्याचे खासदार पवार म्हणाले.
प्रशांत दामले यांनी कलाकारांसाठी नाट्य संमेलन दिवाळी असल्याचे सांगितले. नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरीला उपसांस्कृतिक राजधानीचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
माजी संमेलनाअध्यक्षांची आठवण ठेवणे कौतुकास्पद : उद्योगमंत्री उदय सामंत
पिंपरी-चिंचवड मध्ये १०० वे नाट्य संमेलन होताना माजी संमेलनाअध्यक्षांची आठवण ठेवली ही कौतुकास्पद आहे. ज्या प्रमाणे उद्घाटन सोहळा हसत आहे. त्याप्रमाणे उर्वरीत विभागीय संमेलनं व्हायला हवीत. मात्र संमेलन होत असताना त्यावेळी बॅक स्टेज कलाकार, तंत्रज्ञान यांचा देखील विचार व्हायला पाहिजे. सरकारने दिलेल्या निधीतून कलावंतांच्या मेडिक्लेम आणि पेन्शनची सुविधा मिळावी. नाट्य परिषदेचा मानस असलेल्या वृद्धाश्रमासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्र्यांनी करावी, असे मंत्री सामंत म्हणाले.