कराड – शिंदे, फडणवीस व पवार सरकारने काढलेला 23 सप्टेंबरचा महत्त्वांच्या कार्यकारी पद कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांनी चुक सुधारली ही चांगली गोष्ट आहे. कंत्राटी भरतीतील अग्नीवीर योजना ही मातृयोजना आहे. त्यालाच शिंदे, फडणवीस, पवार सरकार समर्थन करत आहे. ती योजना रद्द करा. अन्यथा जनतेचा रेटा तुम्हाला माहिती आहे, असा इशाराही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिला. आ. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय जनतेच्या रेट्यामुळे रद्द करावा लागला.
आता, तसाच रेटा आल्यामुळे कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा लागला आहे. विदर्भात आज अनेक प्रश्न प्रलंबित असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकासकामांचे दिवे लावलेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता आहे. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. सत्ताधारी असताना आणि विरोधी पक्षात असताना वेगळी भूमिका घ्यायची, हा या सरकारचा दांभिकपणा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न झाल्याने फडणवीस यांनी तत्कालील सरकारवर टीका केली होती. आता त्यांनी आपली जुनी टीका आठवावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपला लोकांपर्यंत जाण्याची भीती वाटते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला घेता येत नाहीत. लोकांमध्ये रोष असून या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे, असेही आ. चव्हाण म्हणाले. तसेच ललित पाटील याचे उच्चपदस्थ लोकांशी संबंध असून सरकार, प्रशासनातील कोणती मंडळी यामध्ये गुंतली आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.