विसर्जनासाठी पालिकेचे मोठे योगदान
मंडळांनी स्वयंस्फूर्तीने मूर्ती पालिकेकडे केल्या सुपुर्द
सात हजार गणेशमूर्तींचे विसर्जन
कराड (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रार्दुभाव व शहरातील वाढत्या बाधितांमुळे यंदा गणोशोत्सवात उत्साह राहिला नाही. कराड तालुका करोनाचा हॉटस्पॉट ठरल्याने शहरासह तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी अगदी साधेपणाने उत्सव साजरा केला. दि. 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिनी मोठ्या उत्साहात संपूर्ण तालुक्यात पर्यावरणपूरक श्रींचे विसर्जन करण्यात आले. शहरातील विसर्जनासाठी कराड नगरपालिकेचे मोठे योगदान राहिले. तर बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी पालिकेच्या “गणेशमुर्ती संकलनासाठी पालिका आपल्या दारी’ या उपक्रमात भाग घेत आपल्या मूर्ती पालिकेच्या ट्रक्टरातमध्ये दिल्या. अनंत चतुर्दशीदिनी शहरातील विविध पाणवठ्यावरील हौदात सुमोर 7 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. यादिवशी कराड तालुक्यातील विविध गणेशमंडळे विसर्जनासाठी येथील प्रीतिसंगमावर दाखल होतात. आकर्षक सजावटी तसेच दरबार मिरवणुका आणि गुलालाची उधळण करत हजारो युवक, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते तसेच मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करणारे नागरिक पहाटेपर्यत ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत अनंत चतुर्दशीला निरोप देतात.
मात्र, यंदा गणेशोत्सवावर करोनाचा सावट राहिले आहे. श्रींच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव काळात कोठेही उत्साह दिसून आला नाही. करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गणेशोत्सव काळात चार फुटापेक्षा जास्त उंच गणेशमूर्तीवर निर्बंध आणले. सार्वजनिक गणेश मंडळांना पाच लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येऊन उत्सव साजरा करता येणार नाही. वर्गणी गोळा करण्यावर निर्बंध घातले. उत्सव काळात करोनाचा प्रार्दुभाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केले.
प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कराड ग्रामीण व शहरी भागातील गणेशोत्सव मंडळांनी “एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवली. तर अनेक उत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव रद्द केला. उत्सवावर होणार खर्च करोना उपाय योजनांसाठी खर्च करण्याचा समाज उपयोगी निर्णय घेतले. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्सव साजरा न करता त्यांनी अगदी साधेपणाने फक्त श्रींची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण उत्सव काळात कोठेही ध्वनी प्रर्दुशन झाले नाही. संपूर्ण तालुक्यात जिल्हाधिकारी सिंह यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. या दिवशी शयन अवस्थेत लीन असलेल्या श्रीविष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. याच दिवशी गणेशोत्सवाची सांगता करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. दि.1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला कराडमधील ग्रामीण व शहरी भागातील सुमारे घरगुती 7 हजार गणेशमुर्तींचे विसर्जन झाले.
यंदा पाहिल्यांदाच कोणत्याही ढोल ताशाशिवाय आणि गुलालाची उधळ टाळून पर्यावरणपूरक श्रीचे विसर्जन झाले. याकामी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी “गणेशमूर्ती संकलनासाठी पालिका दारी हा अभिनव उपक्रम रावबला. या उपक्रमाला दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनापासून ते अनंत चतुर्दशीच्या यंदाच्या 11 व्या दिवसापर्यंत ज्या-ज्यावेळी पारंपरिक विसर्जन असते. त्या-त्या वेळी कराड शहरातील नागरिकांनी कृष्णा-कोयनेच्या पाणवठ्यावर न जाता पालिकेने विसर्जनासाठी सजवलेल्या ट्रक्टरमध्ये श्रींच्या मूर्ती दिल्या. तसेच शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदा प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी विसर्जनदिनी दुपारीच मंडळांच्या मूर्ती पालिकेच्या ट्रक्टरमध्ये दिल्या. गेल्या काही वर्षात हीच मंडळे आपली मूर्ती रात्री 11 वाजल्यानंतर जाग्यावरून हलवत असत. यंदा मात्र पर्यावरणपूरक विसर्जनात या मंडळांचा पुढाकार दिसून आले.
शहरात पालिकेने बांधलेल्या कृत्रिम हौदात शहरातील तसेच शहरालगतच्या अनेक गावच्या नागरिकांनी आपल्या श्री गणेशाचे विसर्जन केले. तर अनेकांनी आपल्या घरीच श्रींचे विसर्जन करून मूर्ती पाण्यात विरघळल्यांनंतर ते पाणी झाडांना घालून पर्यावरणातील संतुलन आबाधित ठेवण्याच्या उपक्रमाला चालना दिली. दरम्यान, यंदा कोणत्याही गोंगाटशिवाय गणेश विसर्जन पार पडले. मुख्य बाजारपेठेतील मार्गावर पडलेला गुलाल धुण्यासाठी यंदा पालिका कर्मचारी तसेच अग्नीशमन दलाला कोणताही त्रास घ्यावा लागला नाही. अगदी अशाच पध्दतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असून यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
ना. देसाईंनी थोपटली मुख्याधिकाऱ्यांची पाठ
यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. असे असलेतरी गणेशोत्सव नियम व अटींच्या अधिन राहून उत्सव साजरा करण्यास शासनाने परवानगी दिली. या काळात कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गणेश विसर्जनासाठी राबवलेल्या अभिनव संकल्पनेचे कराडकरांनी स्वागत केले. अनंत चतुर्दशीला नदीपात्रात विसर्जन बोटीवर स्वतः चालक म्हणून त्यांनी काम पाहिले. या दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे कराडच्या गणेश विसर्जनसाठी दाखल झाले. ते बसलेल्या बोटीचे सारथ्य स्वतः डाके यांनी केले. एक मुख्याधिकारी आपत्तीच्या काळात मैदानात उतरून काम करत असल्याबद्दल ना. देसाई यांनी डाके यांची पाठ थोपटली.