सातारा – केबल सेवा पुरवणाऱ्या “जीटीपीएल’ कंपनीच्या सातारा जिल्ह्यातील ग्राहकांना गेल्या दोन दिवसांपासून क्रीडा, बातम्या व मनोरंजनासह अनेक महत्त्वाचे चॅनेल्स दिसत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक वाहिन्या दूरचित्रवाणीवरून गायब झाल्याने प्रेक्षक वैतागले आहेत. भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाने नवीन दरपत्रक जाहीर केल्यानंतर विविध चॅनेल्सनी रेफरन्स इंटरकनेक्ट ऑफर्स सादर केल्या आहेत. वाहिन्या चालवणाऱ्या कंपन्या आणि वितरकांच्या वादामुळे ही परिस्थिती ओढवली असून, अनेक नागरिक ग्राहक मंचाकडे दाद मागण्याच्या विचारात आहेत.
याबाबतची माहिती अशी, सोनी, सन या देशातील प्रमुख टीव्ही प्रसारण कंपन्यांबरोबर बिझनेस स्टार आणि वायकॉम या कंपन्यांनीही त्यांच्या चॅनेल्सच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार बड्या प्रक्षेपकांनी केबल ऑपरेटर्सना नोटिसा पाठवल्या आहेत. केबल ऑपरेटर्सनी नवीन टेरिफ ऑर्डरप्रमाणे “इंटरकनेक्ट ऑफर्सवर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. यासाठी केबल ऑपरेटर्सना 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. स्वाक्षऱ्या तातडीने न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ग्राहकहित लक्षात घेऊन, केबल ऑपरेटर कंपन्यांनी ही दरवाढ अमान्य केली आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सनी महत्त्वाच्या चॅनेल्सचे सिग्नल डिस्कनेक्ट केल्याने सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक चॅनेल्स गायब झाले आहेत. जीटीपीएल व भीमा रिद्धी या दोन केबल ऑपरेटर कंपन्यांचे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक आहेत. जीटीपीएलची दरवाढ ग्राहकांसाठी अडचणीची ठरली आहे. या वादावर तोडगा काढून सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.