जिल्ह्यात प्रशासन सतर्क; अकरावी प्रवेशाबाबत दहा पथकांद्वारे मोहीम
सातारा (प्रतिनिधी) – जिल्हयातील कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या प्रवेशफेरीचे प्रवेश दि. 29 ऑगस्टपासून सुरु झाले. माध्यमिक विभागाच्या पथकांच्या दोन दिवसांपूर्वीच्या अचानक भेटींनी महाविद्यालय प्रशासन सतर्क झाले होते. करोनाची पार्श्वभूमी असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी प्रवेश फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाली होती. त्यांनतर शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार प्रत्यक्ष प्रवेश राबवली जात आहे की नाही यासाठी गर्दी होण्याची शक्यता असलेल्या निवडक वीस महाविद्यालयांची दहा पथकांद्वारे अचानक तपासणी करण्यात आली.
येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स सातारा व धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही ठिकाणी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रभावती कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे, छत्रपती शिवाजी कॉलेज व महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये माध्यमिक विभागाचे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक साईनाथ वाळेकर, कला वाणिज्य कॉलेजमध्ये मनीषा चंदुरे व लालबहादूर शास्त्री कॉलेजमध्ये जयश्री शिंगाडे या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी भेटी देऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले.
पाटणचे बाळासाहेब देसाई कॉलेज व ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज याठिकाणी उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, वाईतील किसनवीर महाविद्यालयात उपशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, फलटणच्या मुधोजी कॉलेज, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि.कॉलेज, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, तसेच वेणूताई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर व गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी भेट देऊन सूचना दिल्या. कराडच्या सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स येथे गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कोरेगावच्या डी. पी. भोसले महाविद्यालयाला शिक्षण विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर, माणमधील दहिवडी कॉलेजला गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनी भेट देऊन तपासणी केली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर, गर्दी टाळण्यासाठी वेबसाइट, व्हाट्स ऍप, एसएमएसचा वापर, शाखानिहाय स्वतंत्र काऊंटर, टक्केवारी किंवा शाखानिहाय प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचे विभाजन, पालक व विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबरची सोय, दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्राप्त अर्ज संख्या व क्षमता, प्राचार्यांचे प्रक्रियेवरील संनियंत्रण, आकारलेले शुल्क, गुणवत्तेनुसार प्रवेश इत्यादी मुद्यांची तपासणी करण्यात आली. राजेश क्षीरसागर यांना राज्यातील आठ शैक्षणिक विभागांपैकी एका महत्त्वपूर्ण विभागाची पदोन्नतीने लवकरच जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची शिक्षण विभागात चर्चा आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक विभागातील बाबी व प्रवेश प्रक्रियेवर बारकाईने लक्ष घातले असून जाता जाता त्यांच्या कारवाईचा फटका बसू नये याची काळजी कनिष्ठ महाविद्यालयांनी घेतल्याचे दिसते. जिल्हयातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देण्याबाबत त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी सूचना दिल्या आहेत.
गुणवत्तेनुसारच प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालक, विद्यार्थी व काही संघटनांकडून शुल्क कमी करण्याबाबत मागणी केली जात आहे. विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यितबाबत शुल्क निर्धारित करण्याचा अधिकार पालक- शिक्षक समितीला आहे. या वर्षी शुल्क कमी करणे, टप्प्यात टप्प्याने भरणे, सक्ती न करणे याबाबत राज्य शासनाने दि. 8 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तथापि, संस्थांनी स्वत:हून शुल्क कमी करण्याबाबत पुढाकार घेऊन पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा