श्रीरामपूर – सुमारे पाचशे वर्षांची तपस्या, मोठ्या संख्येने राम भक्तांचे बलिदान आणि प्रदीर्घ संघर्षानंत अखंड विश्वातील हिंदुंची अस्मिता तसेच प्रत्येकाच्या ह्दयस्थानी विराजमान असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील भव्य मंदिरात दि.२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहेत. या दिवशी देशवासीयांनी गावोगावी दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन राष्ट्रसंत व अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण समितीचे विश्वस्त तसेच कोषप्रमुख स्वामी गोविंद देव गिरी यांनी केले आहे.
अयोध्येतील या नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करून श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष श्री नृपेंद्र मिश्रा , महासचिव चंपत राय, विश्वस्त व पेजावर मठ (उडपी,कर्नाटक) चे स्वामी श्री. विश्वप्रसन्न तीर्थ महाराज, कोषप्रमुख राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी (पुणे) यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाची रूपरेषा सांगून निमंत्रण पत्रिका व समितीच्या वतीने उपस्थित राहण्यासाठी विनंती पत्र दिले. त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित राहण्यास संमती दिली आहे, असेही गिरी यांनी सांगितले.
देशातील निमंत्रित चार हजार साधूसंत ,अडीच हजार समाजातील विविध प्रतिनिधी या सोहळ्याचे साक्षीदार ठरणार आहेत. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री विजयेंद्र सरस्वती महाराज , वाराणसी येथील वैदिक रत्न पं. श्री.लक्ष्मीकांत दिक्षित व पं. श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड आदी प्रमुख मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.
स्वामींनी पुढे सांगितले की, या भव्य दिव्य आणि अविस्मरणीय सोहळ्याच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत सर्व राम भक्तांनी आपापल्या गावात, भागात , कॉलनीतील आसपासच्या मंदिरात एकत्र येऊन मंदिर केंद्रित भजन, कीर्तन करावे. “श्रीराम जय राम जय जय राम”. या मंत्राचा १०८ वेळा सामूहिक जप करावा .त्याचसोबत हनुमान चालीसा, सुंदरकांड, रामरक्षा स्तोत्र आदींचे सामूहिक पठण करावे. अयोध्येतील थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी टी. व्ही., एल. ई.डी. स्क्रिनची व्यवस्था करावी. तसेच घंटानाद, शंखध्वनी, महाआरती व प्रसाद वितरण करावे. त्याच दिवशी संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या घर, अंगणात दिवा लावावा, दीपमालेची सजावट करावी.
जगभरातील कोट्यवधी घरांमध्ये हा दीपोत्सव साजरा करायचा आहे. हा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या वेळ व सोयीनुसार सहकुटुंब अयोध्येतील नवनिर्मित भव्य दिव्य मंदिरात येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहनही स्वामींनी केले आहे.