हिर्डोशी खोऱ्यात भात पिकाच्या उत्पादनावर परिणाम
नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
भोर – भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील म्हसर करंजगावसह हिर्डोशी खोऱ्यात (ता. भोर) इंद्रायणी भाताच्या ओंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दगा दिल्याने इंद्रायणी भाताचे पळंज (दाणा न भरलेल्या पोळक ओंब्या) तयार झाले असून, भाताचे पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना दिले आहे.
भोर तालुक्यातील हिर्डोशी खोरे इंद्रायणी भात पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा पावसाच्या अनियमितपणामुळे या पिकांची अनियमित वाढ झाली आहे. पीक ओंबी पोसण्याच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने इंद्रायणी तांदळाचा उतारा कमी प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. भोर तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे 7 हजार 500 हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. इंद्रायणी या गरव्या भाताची सर्वाधिक लागवड येथे असून गरव्या जातीचे हे भात पीक असलेल्या या इंद्रायणी भाताची वाढ 120 ते 130 दिवसांत होते. इंद्रायणी भात पिकांची वाढ होत असताना या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला. भात पिक पोटऱ्यांत येण्याच्या काळात पाऊस गायब झाल्याने पीक पळंजावर गेल्यामुळे यांचा परिणाम पिकांच्या उताऱ्यावर होणार आहे.
25 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता
इंद्रायणी तांदळाचा दर 20 ते 25 टक्के घटण्याची शक्यता आहे. या सुवासिक व चवीला चांगला असलेल्या तांदळाला मागणी जास्त असते; परंतु या पिकाच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणी आला आहे, त्यामुळे या पिकाबाबत पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरादेवघर व भाटघर धरण भागात भात हे प्रमुख पीक असून या भागाला भाताचे आगार समजले जाते. भात पीक हे येथील लोकांचे आर्थिक साधन असून भाताच्या उत्पनावरच कुटुंब चालते मात्र पावसाच्या लहरीपणामुळे या वर्षी शेतकरी अडचणीत आला आहे, त्यामुळे भाताच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
– संजय मळेकर, किसान सेल अध्यक्ष, कॉंग्रेस