महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, राज्याचे कृषी आयुक्त, जलसंधारण सचिव, विभागीय आयुक्त यांसह अनेक पदे सांभाळत श्री. प्रभाकर देशमुख यांनी महाराष्ट्राला चांगली दिशा दिली. जलयुक्त शिवार या त्यांच्या योजनेने क्रांती केली. राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होण्यास मदत झाली.
ग्रामस्वच्छता अभियान, एक दिवस शाळेसाठी, शेतीसाठीचे योगदान यासह अनेक योजना राबवून महाराष्ट्राला एका उंचीवर नेणारा माणदेशी सुपुत्र देशपातळीवर पंतप्रधान पुरस्काराने दोन वेळा गौरवला जातो ही माणदेशी जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. देशाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाला साथ देत निवृत्तीनंतर माण व खटाव तालुक्यांच्या विकासासाठी प्रचंड मेहनत प्रभाकर देशमुख (अप्पा) घेत आहेत. आपल्या कामामुळे सर्वसामान्य जनतेला आधारवड वाटत असलेल्या प्रभाकर देशमुख यांचा आज वाढदिवस… त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा
माण तालुक्यातील लोधवडे हे श्री.प्रभाकर देशमुख यांचे गाव. आयएएस अधिकारी झाल्यावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना त्यांनी गावाची नाळ तुटू दिली नाही. लोधवडे येथे जलसंधारणाची कामे, बंधारे, वृक्षारोपण, सलग समतर चर यांसह अनेक कामे करून गाव राज्यात आदर्श बनवले. दुष्काळातही या गावाला पाणीटंचाई जाणवली नाही. उलट दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी भरण्यासाठी टँकर लोधवडेतूनच भरले जात होते. स्वयंपूर्ण खेडे केल्यावर गाव पाहण्यासाठी राज्यातून लोक येत होते. अभिनेता आमीर खान यांनीही लोधावडे येथील कामांची पाहणी केली. पुढे महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यावर आमीर खान यांनी पाणी फाऊंडेशन स्थापन केले.
लोधवडे गावचा आदर्श व प्रभाकर देशमुख यांचे मागदर्शन घेऊनच राज्यभर काम केले. देशमुख राज्याचे जलसंधारण सचिव असताना महाराष्ट्रात दुष्काळ होता. त्यावेळी पंकजा मुंडे जलसंधारण मंत्री होत्या. त्यांनी दुष्काळावर मात करण्याबाबत देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर देशमुख यांनी लोधवडे पॅटर्न व जलयुक्त गाव उपक्रम राज्यभर राबवला. राज्यातील पाच हजार गावात जलयुक्त शिवार अभियान राबवले गेले. साडेचार हजार गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाली. केलेल्या कामांमध्ये पावसानंतर पाणी साठले. वाहून जाणारे पाणी गावातच मुरवले गेले आणि हजारो गावे टँकरमुक्त झाली. यामध्ये माण व खटाव तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. विहिरींना पाणी वाढल्यामुळे बागायत क्षेत्रही वाढले.
त्याचबरोबर नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम राबवून माण, येरळा, वसना व बाणगंगा या जिल्ह्यातील नद्या पुनर्जीवित केल्या. मागेल त्याला शेततळे, लहान शेतकऱ्यांना विहिरी यांसारख्या योजना राबवून शेतकऱ्यांना आधार देण्याचे मोठे काम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी केलेले काम राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. देशातील मध्य व पश्चिम विभागातील कडधान्य उत्पादनात केलेले काम देशात सर्वोत्तम ठरले व त्यांना “कृषिकर्मण” हा पुरस्कार देऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह व शरद पवार यांनी गौरवले.
शेतीतील पिकांचं नुकसान कमी व्हावं म्हणून कीड व रोगनिदान उपक्रम, कृषी सल्ला सेवा योजना राज्यात प्रभावीपणे राबवल्याबद्दल व कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल प्रभाकर देशमुख यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रशासनातील सर्वोच्च सेवेसाठीच्या पंतप्रधान पुरस्काराने गौरवण्यात आले. पिकांवरील कीड नियंत्रण व सल्ला योजनेत माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर केल्याबद्दल केंद्र शासनाचा “नॅशनल अवॉर्ड फॉर गव्हर्नन्स” या पुरस्काराने 2012 मध्ये प्रभाकर देशमुख यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन “जी फाईल्स गव्हर्नन्स अवॉर्ड” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रभाकर देशमुख यांनी प्रशासकीय सेवेत काम करताना घेतलेल्या धोरणांचा माणदेशी शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. माण व खटाव या दुष्काळी तालुक्यांना त्यांच्या धोरणांमुळे हजारो शेततळी मिळाली, हजारो विहिरी झाल्या. ठिबकला अनुदान मिळाले. जलसंधारण सचिव असल्याने जलयुक्त शिवार कार्यक्रमात लोकसहभागातून पाचशे कोटीवर कामे झाली. त्यामध्ये ओढ्यांवरील व नदीवरील बंधारे, छोटे पाझर तलाव यांसह फळबागा लागवड अनुदान यासारख्या अनेक योजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरल्या. त्यांच्या या कामामुळे आज हजारो हेक्टर ऊसाचे क्षेत्र माण व खटाव तालुक्यात वाढल्याने हळू हळू साखर कारखानदारीही वाढू लागली आहे. हजारो हेक्टर कांदा लागवड क्षेत्र वाढले, डाळिंब पिकाला पुन्हा नवसंजीवनी मिळाली. डाळिंब, आंबा, सीताफळ या बागा मोठ्या प्रमाणात वाढल्या. हा कायापालट होण्यास श्री. देशमुख यांनी घेतलेले कृषी धोरणच महत्वपूर्ण ठरले आहे.
आण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी गावाचा कायापालट केला. त्याच धर्तीवर श्री. देशमुख यांनी लोधावडेचा कायापालट केला. सर्वसामान्य शेतकऱयांमध्ये मिसळणारा अधिकारी हा खरा जनसेवकच आहे, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी देशमुख यांच्या कामाची स्तुती केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे नेण्याचे काम श्री. देशमुख करत आहेत. कोकण आयुक्त असताना रायगड संवर्धनासाठी सुमारे 600 कोटीचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. शिवनेरी येथेही किल्ला संवर्धनाचा कार्यक्रम राबवला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी असताना कोल्हापूर जिल्ह्यात 1728 शाळांत राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम राबवला. त्यामध्ये मुलांचा बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकास व सामाजिक जाणीव निर्मिती या माध्यमातून गुणवत्तावाढीचा कार्यक्रम राबवला. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या मेरिटमध्ये 112 पैकी 72 मुले कोल्हापूर जिल्हा परिषदची होती. या कामाची दखल घेऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वृक्ष माझा सखा हा उपक्रम माण तालुक्यातील अनेक शाळांमध्ये राबवला. श्री. प्रभाकर देशमुख यांचे कार्य तरुणांना आदर्शवत असून सर्वसामान्य जनतेला आधार देणारे ठरले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा.
माण व खटावच्या विकासाचा ध्यास
निवृत्तीनंतर आरामात आयुष्य न जगता सर्वसामान्य जनतेत रमणाऱ्या प्रभाकर देशमुख यांनी समाजसेवेचा वारसा पुढे सुरु ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्नेहाचे संबंध असल्याने पक्षाच्या माण खटावच्या कामाची धुरा प्रभाकर देशमुख यांच्यावर सोपवली. विधानसभेनंतर जोरदार कार्य सुरूच ठेवले. दहिवडी व वडूज नगरपंचायतीमध्ये नेत्रदीपक यश मिळवले. सामाजिक कामाची आस्था त्यांनी कायम जपली.
राजकारण समाजसेवेचे माध्यम मानून त्यांनी केलेलं काम जनहिताचे ठरत आहे. त्यांच्या पत्नी अनुराधा व कन्या हर्षदा देशमुख जाधव यांच्या माध्यमातून ड्रीम सोशल फाउंडेशन व माणदेशी फाउंडेशनमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी मदत केली. वृक्ष माझा सखा उपक्रमामार्फत शाळेतील मुलांना घरी लावण्यासाठी दहा हजार फळझाडे दिली.
ग्रीन माणदेश उपक्रमांतर्गत माण व खटावमध्ये 50 हजार झाडे देण्यात आली. कृषी बचत गट स्थापन करून शेतकऱ्यांना गटशेतीसंदर्भात मार्गदर्शन केले. माण व येरळा नदी पुनरुज्जीवन अंतर्गत 20 कोटी रुपयाचे सिमेंट बंधारे बांधण्यात आले. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकास, अध्यात्म, गटशेती, शिक्षण, जल साक्षरता, महिला सबलीकरण यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याद्वारे विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. महिला बचत गट स्थापन करून महिलांना प्रोत्साहन दिले.