नवी दिल्ली : भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे दिल्लीमधील एम्स रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. स्वराज यांना रात्री साडे नऊ वाजता अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अगदी संध्याकाळपर्यंत त्या लोकसभेच्या कामकाजावर लक्ष ठेऊन होत्या हे त्यांनी केलेल्या शेवटच्या ट्विटमधून दिसून येते.
स्वराज यांनी सायंकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी कलम 370 संदर्भात निर्णय घेण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. प्रधान मंत्री जी आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji – Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019
मी माझ्या आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते असे शब्द असणारे हे ट्विट स्वराज यांच्या निधनाच्या बातमीनंतर चांगलेच व्हायरल झाले आहे. काल राज्यसभेमध्ये कलम 370 रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही त्यांनी अभिनंदन केले होते. सात वेळा लोकसभेच्या खासदार राहिलेल्या स्वराज या वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदावर विराजमान झालेल्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी एम्स रुग्णालयाकडे धाव घेतली.