सातारा – जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता कमी दिसत आहे. सद्य परिस्थितीत जिल्ह्यातील चार गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सतर्कता बाळगली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.
माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात यापूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची मोठी समस्या भेडसावत होती. काही वर्षांपूर्वी पाणलोटची मोठ्या प्रमाणात कामे झाल्याने टंचाईची तीव्रता कमी झाली. दोन वर्षांपासून जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. पहिल्या टप्यात टॅंकरग्रस्त गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी टॅंकरची संख्या कमी झाली आहे.
वाई तालुक्यातील गुंडेवाडी येथे 455 लोकसंख्या व 185 पशुधनासाठी एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी- भोसगाव येथील 540 लोकसंख्या व 130 पशुधन बाधित झाले आहे. कराड तालुक्यातील वानगरवाडी व बामणवाडी येथील 2178 लोकसंख्या व 982 पशुधन बाधित झाले आहे.
या चार गावात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दोन विहिरी व दोन बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित गावांकडून पंचायत समितीला माहिती देण्यात येत आहे.
त्याबाबतचा अहवाल पंचायत समित्यांकडून पाणीपुरवठा विभागाला देण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले याबाबत वारंवार आढावा घेऊन मार्गदर्शन करत असल्याचे श्री. चक्के यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतर्फे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
जिल्ह्यात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी होत असून प्राधान्यक्रमाने टॅंकरग्रस्त गावांमध्ये या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या टॅंकरचे प्रमाण कमी असले तरी संभाव्य पाणीटंचाई गृहित धरुन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार एकही गाव टॅंकरपासून वंचित राहणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभाग सतर्क आहे.
गौरव चक्के, कार्यकारी अभियंता