नगर – जिल्ह्यातील सहा तहसीलदारांच्या बदल्याचे आदेश महसूल विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत. यात सहा तहसीलदार जिल्ह्याबाहेर तर तीन जण जिल्ह्यात रिक्त झालेल्या जागेवर बदलून आले आहेत. या सर्वांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे बदली आदेशात नमूद केलेले आहे. तसेच गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहुर्त मिळाला आहे. यात नगर जिल्ह्यातील 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यात झाल्या असून, 11 अधिकारी नव्याने बदलून आले आहेत.
महसूल विभागाच्यावतीने विनंती, कार्यकाळ पूर्ण होणे आणि प्रशासकीय कारणांसह बदल्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार वैशाली आव्हाड यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कुळ कायदा विभागात तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या तहसीलदार पदावर, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे बदली झाली आहे.
नरेशकुमार बहिरम तहसीलदार नाशिक या पदावर, जिल्हा निवडणूक शाखेचे तहसीलदार चंद्रशेखर शितोळे यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सामान्य प्रशासन विभागात बदली झाली आहे. संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार या पदावर बदली झाली आहे.
चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांची राहाता तहसीलदार पदावर, अंमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची जिल्हा निवडणूक शाखेत तहसीलदार पदावर नियुक्ती झाली आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असणारे चंद्रजित राजपूत यांची राहुरीच्या तहसीलदार पदावर बदली झाली आहे. राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
तर महसूलच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांची श्रीवर्धन (जि. रायगड) येथे प्रांताधिकारीपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर नाशिकहून अरविंद नसरीकर आले आहेत. तर पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांची जळगाव येथे भूसंपादन अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी नागर्पूर भूसंपादन अधिकारी हेमलता बडे बदलून आल्या आहेत. श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार यांची बदली झाली असली तरी त्यांना नियुक्तीचे ठिकाण मिळालेले नाही.