वडूज – मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मराठा बांधवांनी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू केले असून मराठा बांधवांबरोबर महिलाही आक्रमक झाल्या आहेत. ‘चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष’ अशी आक्रमक भूमिका घेऊन मी माझ्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन सरकारचा जाहीर निषेध करत आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने तसेच मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ला यामुळे खटाव तालुक्यातील कान्हरवाडीतील सौ. कोमल प्रवीण जाधव यांनी कान्हरवाडी ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या मायणीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांनी दिली.
एम. एस्सी. झालेल्या सौ. कोमल प्रवीण जाधव राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी 2021 मधील कान्हरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. मात्र, गेल्या तीन वर्षापासून कोणतेही अपेक्षित बदल झाले नाहीत व ठोस विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे त्यांना राजकारणात रस राहिला नाही.
मात्र, अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या घटनेपासून त्यांचे मन व्यथित झाले. सरकारकडून कोणतीही अपेक्षा पूर्ण होत नाही. गेल्या काही दिवसापासून मराठा बांधव मोर्चे काढत आहेत. उपोषण करत आहेत. पण सरकार याची दखल घेत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व आरक्षण मिळेपर्यंत माझ्यासारखी महिला गप्प बसणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.