कराड – पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावरील कराड-नांदलापूर दरम्यान जुने उड्डाणपुल पाडून नवीन सलग उड्डाणपुल बांधण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. यामुळे महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असून प्रवासी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामार्ग देखभाल विभाग, वाहतूक पोलीस व उड्डाणपुल निर्माण कार्य करणाऱ्या डी. पी. जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढून प्रवासी, नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशा सूचना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
कराड-नांदलापूर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या नवीन उड्डाणपुलाच्या कामाची आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी डी. पी. जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपगराध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, इंद्रजित चव्हाण, अशोकराव पाटील यांच्यासह कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, डी. पी. जैन कंपनीचे व्ही. पी. प्रदिपकुमार जैन, प्रोजेक्ट मॅनेजर सतेंद्रकुमार वर्मा, सौरभ घोष आदी. उपस्थित होते.
कराड व मलकापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. येथील बहुप्रतीक्षित नवीन उड्डाणपुलाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. या पुलाचे काम सुरु झाल्यापासून दर महिन्याला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण या कामाचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत असतात. त्यानुसार आ. चव्हाण यांनी सदर पुलाच्या कामाचा आढावा महामार्ग निर्माण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
उड्डाणपूल उभारणीदरम्यान सहापदरी सेगमेंटल पुलाच्या दुसऱ्या टप्प्याची उभारणी करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये ढेबेवाडी फाटा येथील पिलरवर सेगमेंटलची उभारणी करण्यात आली.
देशात कमी ठिकाणी अशा पुलाची उभारणी होत आहे. एका पिलरवर सहा लेन व पुलाखाली आठ लेन अशा एकूण 14 लेनचे काम सुरु आहे. अशावेळी दोन्ही शहरातील नागरिकांसह प्रवास्यांना त्रास होत असतो. हा त्रास कशा पद्धतीने कमी करता येईल, याबाबत आ. चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. त्याचबरोबर याबाबत कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन होणारी वाहतूक कोंडी, तसेच दोन्ही शहराच्या दृष्टीने महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.