नगर -नगर अर्बन बॅंकेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारत अफरातफर केली. त्यांच्या गैरकारभारामुळे नगर अर्बन बॅंक बंद पडली. खोटी वसुली दाखवली गेली. त्यामुळे एनपीए वाढला. ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने पैसे ठेवले होते. मात्र, चिल्लर घोटाळा, बनावट सोने तारण घोटाळा, सस्पेन्स अकाउंट घोटाळा, बोगस कर्ज वाटप अशा घोटाळ्यांमुळे बॅंक अडचणीत आली. ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळेनात. त्यामुळे या लुटारूंवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत ठेवीदारांनी माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी आसूड उगारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नगर अर्बन बॅंकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी बॅंक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली बुधवार (दि.22) रोजी स्व. गांधी यांच्या घरावर व पोलीस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. घरासमोर मोर्चा आल्यानंतर माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी मोर्चाला सामोरे गेले. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात व बॅंक पुन्हा सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. थकीत वसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू असतानाच रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केला. त्यामुळे अडचण झाली अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, आम्हाला आमच्या ठेवी व खात्यात अडकलेले पैसे पाहिजेत. बॅंक सुरू होणार किंवा नाही, हे सांगू नका. आम्ही दोन वर्षे तुमचे ऐकले.
आता आम्ही किती दिवस थांबायचे, असा सवाल करत ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली. घोषणाबाजी झाल्यानंतर मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. ठेवीदारांनी स्वतःवर आसूड ओढत आंदोलन केले. अपर अधीक्षक प्रशांत खैर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. बॅंक घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्ह्यांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. त्याचा अहवाल अद्यापही मिळाला नाही.
पोलिसांनी तत्काळ दोषी संचालक, त्यांचे साथीदार व कर्जदारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध का घातले, परवाना का रद्द झाला, हे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आलेले आहे. संचालकांनीच कर्जाच्या रकमा घेतल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही, म्हणून ते पैसे भारत नाही, अशी भूमिका माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी मांडली. येत्या दोन दिवसात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अपर अधीक्षक खैरे यांनी दिले. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, नाना देशमुख, अच्युतराव पिंगळे, महेश जेवरे आदींसह ठेवीदार उपस्थित होते.
ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करा
ठेवीदार गोरगरीब आहेत. त्यांना पैसे मिळत नसल्याने त्यांना औषधोपचार, मुलामुलींच्या लग्नासाठी पैसे मिळेनात, अशा व्यथा यावेळी मांडण्यात आल्या. अपर अधीक्षक खैरे यांनी फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला. उद्या (गुरुवारी) ऑडिट रिपोर्ट दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. दोषी संचालकांवर एमपीआयडी म्हणजेच ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.