पिंपरी – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात यंदा पावसाला सुरुवातही उशिरा झाले आणि मॉन्सून अधिक वेळ बरसलाही नाही. त्यामुळे ऐन नोव्हेंबरच्या मध्यातच धरणातील पाणीसाठा सुमारे 12 टक्क्यांनी घटला आहे. सध्या पवना धरणात 88 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मे महिन्याच्या अखेरपर्यंत तहान भागवू शकतो. परंतु येत्या पावसाळ्यात जर पावसाचे आगमन उशिरा झाले तर पाणी टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे सर्वांनीच पाणी जपून वापरण्याची गरज आहे.
जून महिन्यापासून धरण परिसरात दोन हजार 833 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणातून दररोज 510 दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जातो. धरणापासून नदी पात्रातून आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून पाणी जलवाहिन्यांद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा होतो. सध्या 25 नोव्हेंबर 2019 पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. समान प्रमाणात सर्वांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने दोन भागात विभाजन केले आहे. त्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण शहराला 510 एमएलडी पाणीपुरवठा करण्याऐवजी निम्मे शहरालाच तेवढे पाणी दिले जात आहे. त्यामुळे शिवाय, एमआयडीसीकडून दररोज 30 एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, आंद्रा धरणातून दररोज 50 एमएलडी पाणी शहराला मिळत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्याला सुरुवात उशीर होत आहे. जून महिन्यात एक-दोन पाऊस झाल्यानंतर थेट जुलै महिन्याच्या मध्यात पावसाला जोरदार सुरुवात होते. गेल्यावर्षी पावसाळा बराच लांबला होता. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा होता. परंतु यंदा मॉन्सून गेल्यावर्षीच्या तुलनेत लवकर परतला आहे. येत्या वर्षी जर पावसाने ओढ दिली तर पाण्याचे संकट ओढावू शकते. यामुळे नागरिकांनी आतापासून पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. जास्तीत जास्त पाणी वाचविणे, पाण्याचा पुनर्वापर करणे अशा उपाययोजना केल्यास संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता कमी होऊ शकते.
धरणातील पाण्याची परिस्थिती
1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – दोन हजार 833 मिली मीटर
धरणातील उपयुक्त पाणीसाठा – 7.53 टीएमसी
सध्याचा पाणीसाठा – 88.50
धरणातील जलाशय पातळी – 611. 98
तीन दिवस पावसाची शक्यता
जून महिन्यापासून अद्याप पर्यंत शहरासह धरण परिसरात पुरेसा पाऊस पडला नाही. नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या दरम्यान दोन दिवस पाऊसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस पडला नाही. 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच या दिवशी मेघगर्जेनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत 90.38 टक्के धरणात पाणी साठा होता. यावर्षी ही स्थिती 88 टक्क्यांवर आली आहे. पाणी पुरवठ्याची मागणी सध्या आहे तेवढीच राहिली तर पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. एप्रिल किंवा मे 2024 पर्यंतच पाणी पुरेल अशी स्थिती येईल. मात्र पाण्याची मागणी कमी झाल्यास पाणी साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेसा होईल.
– रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण.