भाग्यश्री फरांदे; सातारारोड येथे श्री जरंडेश्वर कृषी महोत्सवाचे उद्घाटन
सातारा – कोरेगाव तालुका भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असून येथील भाजीपाल्याची चव फार चांगली आहे.सेंद्रिय भाजीपाल्यास यापुढे पुणे – मुंबई शहरात मोठी मागणी राहणार असून सेंद्रीय भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. सातारा जिल्ह्यातील शेतकरी सेंद्रिय शेती क्षेत्रात क्रांती करू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी केले.
सातारारोड -पाडळी (ता. कोरेगाव) येथील श्री जरंडेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीने दि. 16 ते 18 नोव्हेंबरपर्यंत कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. येथील यशवंत औद्योगिक वसाहत मैदानावर भरलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी फरांदे बोलत होत्या. जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त कृषी उद्योगांना जिल्हा कृषी खात्याने मान्यता दिली असून त्यापैकी 36 उद्योग कोरेगाव तालुक्यातील आहेत.त्याला शासनातर्फे 35 टक्के अनुदान मिळते. शेतकऱ्यांच्या घरातील मुलांनी उद्योग, व्यवसाय, व्यापारात आले पाहिजे.
सेंद्रिय शेती ही भारताच्या मालकीची आहे, ती आपण सोडता कामा नये. गूळ,घेवडा, ज्वारी, बाजरी यात हा जिल्हा पिढ्यानपिढ्याचा मानकरी आहे. कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. सेंद्रिय शेतीसाठी शासनातर्फे मार्गदर्शन केले जाते त्यात सहभागी व्हा, असे आवाहन भाग्यश्री फरांदे यांनी केले.तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांनी कृषी उत्पादक बचत गटांचे मालाचे ब्रॅंण्डिंग, विक्री कृषी खात्याकडून केले जाईल, असे सांगितले. प्रास्ताविकात श्री जरंडेश्वर कृषी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष सुरेशबापू फाळके म्हणाले, कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न केला जाईल.
भविष्यात अनेक योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष सर्जेराव जाधव, संचालक, मंडल कृषी अधिकारी, भारतीय किसान संघटनेचे जिल्हा संघटक खंडेराव कुलकर्णी, पाणी फौंडेशनचे समन्वयक सुखदेव भोसले, राहूल भोसले, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले. प्राजक्ता चव्हाण यांनी आभार मानले.
विविध पुरस्कारांचे वितरण
आले, टोमॅटो, हळद, मसाला पीक, ऊस, स्ट्रॉबेरी, पुष्पशेती, समूह शेती, गूळ प्रक्रिया उद्योग, कृषी अवजारे निर्मिती, फळभाजी, पालेभाजी क्षेत्रात लक्षणीय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार, जरंडेश्वर कृषीभूषण पुरस्कार, जरंडेश्वर वनमित्र पुरस्कार, शेतीनिष्ठ महिलांना जिजामाता शेतकरी पुरस्कार, जरंडेश्वर कृषीकन्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हणमंत सकुंडे यांना जरंडेश्वर शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.