वाई – तरुणांच्या भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार पुन्हा निवडून द्या, असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
पसरणी, ता. वाई येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार मदन भोसले, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, माजी उपसभापती विजयसिंह नायकवडी, रिपाइं (अ) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सरपंच हेमलता गायकवाड, रोहिदास पिसाळ, दीपक धनवडे, विकास शिंदे, भाजप वाई तालुका उपाध्यक्ष यादव महांगडे, चंद्रकांत धायगुडे, राजश्री धायगुडे, राजेंद्र गायकवाड, सुनील महांगडे, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश येवते उपस्थित होते. दरम्यान, वाई येथील महागणपती मंदिरात दर्शन घेऊन, उदयनराजेंनी आरती केली.
पसरणीतील बैठकीत उदयनराजे म्हणाले, भैरवनाथासमोर नतमस्तक होऊन मी विजयाचे लेणे मागितले आहे. स्थिर सरकार असते, तिथेच विकास होतो. पूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात लोकसभेत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे केवळ दोन सदस्य होते. तेथून स्थिर सरकारपर्यंत भाजपने मजल मारली आहे. मोदी सरकारचे अनेक निर्णय जनतेसाठी फायदेशीर ठरले. विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही.
मदन भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे वंशज सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देश कोणाच्या ताब्यात द्यायचा, हे ठरवण्याची वेळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पसरणीतून होतोय. श्री काळभैरवनाथाचा आशीर्वाद उदयनराजेंना मिळाला आहे.
अशोक गायकवाड म्हणाले, उदयनराजेंना पसरणीतून सगळ्यात जास्त मताधिक्य देण्याचे काम आम्ही करणार आहोत. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना दारिद्य्राला सामोरे जावे लागले होते. आता शेतकरी, महिला, मजूर, खेळाडू यांना चांगले दिवस आले आहेत. शेतकर्यांना पेन्शन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय फायदेशीर ठरला आहे. जो राजा महाराष्ट्रातील मनामनावर अधिराज्य गाजवत आहे, त्याच राजाच्या वंशजाला निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी जीवाचे रान करावे.
दरम्यान, उदयनराजे यांनी वाई शहरात प्रचार फेरी काढली. त्यापूर्वी महागणपती मंदिरात आरती केली. मदन भोसले, सुरभी भोसले, भाजपचे वाई विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सागर पवार, शहराध्यक्ष विजय ढेकाणे, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, युवा सेना शहराध्यक्ष गणेश सावंत, राकेश फुले व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर उदयनराजेंनी विवेक भोसले यांच्या निवासस्थानाला भेट दिली.
तेथून मंडईतील विक्रेत्यांशी संवाद साधून, उदयनराजे प्रसिद्ध चहा कट्ट्यावर पोहोचले. तेथे छोटेखानी सभा झाली. उदयनराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानंतर रविवार पेठेतील शिवप्रतिज्ञा शाळा, काळुबाई मंदिर, भोईराज गणेश मंडळ, मारुती मंदिर येथे उदयनराजेंनी भेट दिली. शेंदुरजणे येथे काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. प्रमोद जगताप उपस्थित होते.
‘मिलीजुली’ सरकारमध्ये ब्लॅकमेलिंग
दहा वर्षांपूर्वी काँग्रेसचे ‘मिलीजुली’ सरकार केंद्रात होते. अशा प्रकारच्या सरकारमध्ये ब्लॅकमेलिंग वाढत असते. त्यामुळे स्थिर सरकार असणे अत्यंत आवश्यक आहे, असे उदयनराजे म्हणाले.