पारगाव पेठ : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात सुरू झाला. यावेळी पारगाव तर्फे खेड या गावातून नवखंड भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन कुरवंडीच्या चोंभाबाई देवीच्या अखंड हरीनाम सप्ताहमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
दरम्यान, कारेगाव येथील माजी सरपंच बबन रामभाऊ कराळे यांनी भाजप सरकारवर नाराजी व्यक्त करत ही लढाई केवळ डॉ. कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी नसून ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी, अशी लढाई आहे.
यावेळी सातगाव पठार भागाला सर्वात जास्त भेडसावणारा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर स्थानिक युवकांनी डॉ. कोल्हे यांचे लक्ष वेधले. ज्याप्रकारे बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा शब्द पळाला तसा पाण्याचा देखील प्रश्न सोडवा, अशी साद युवकांनी घातली. कळमोडीचे पाणी आम्हाला मिळत नाही तरी देखील आमच्या शेतजमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के लाधले आहेत. हे उठविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी डॉ. कोल्हे यांना केली.
दरम्यान पारगाव येथे अशोक पवार या युवा शिवसैनिकाने मार्गदर्शन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी सातगाव पठार या भागासाठी पाणी कशा प्रकारे मिळू शकते याशिवाय राज्यकर्त्यांनी या भागाला इच्छाशक्ती अभावी पाण्यापासून कशा प्रकारे वंचित ठेवलं याचा पाढा वाचला.
यावेळी सुरेश भोर, देवदत्त निकम, पूजा वळसे पाटील, दिलीप पवळे, भरत मोरे, हेमंत एरंडे, अशोक पवार, सूर्याजी सावंत, धनंजय जाधव, गणेश चिखले, प्रशांत, आचार्य, शुभम जेकटे, सुरेखा निघोट, विजय शेटे, बाळासाहेब गटे, उमा माटे यांसह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.